दुर्दैवी ! होळीच्या दिवशीच 3 चिमुरड्यांचा होरपळून मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

बोधगया : पोलीसनामा ऑनलाईन – बिहारमधल्या बोधगयामध्ये होळीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. होळी पेटवली जात असताना 4 चिमुरडी मुल होरपळल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. बोधगया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनकोसी गावात रविवारी (दि. 28) ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रोहित कुमार (12 वर्षे), नंदलाल मांझी (13 वर्षे) आणि उपेंद्र कुमार (12 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. रितेश कुमार (12 वर्षे) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात मुलांच्या कुटुंबातील कोणीही एफआयआर दाखल केलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, होळी पेटवल्यानंतर काही मुल पेटती लाकडं घेऊन गावाच्या समोर आलेल्या डोंगरावर गेले होते. यातील 4 मुल डोंगरावर फार पुढे गेली होती. यावेळी मुलांपैकी कोणीतरी पेटत लाकूड झूडपात फेकले होते. त्यामुळे झाडीला आग लागली. त्यामुळे डोंगरावर गेलेली मुल अडकून पडली. आगीत होरपळल्याने तिघांचा मृत्यू झाला.