भरधाव कार झाडावर आदळून तीन ठार, तीन जखमी

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (रविवार) दुपारी सव्वाचारच्या सुमारास हिंगोली ते कनेरगाव मार्गावरील चिंचाळा पाटीजवळ झाला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील माळेगाव येथील मुक्तारखान गफूरखान व अन्य पाचजण इंडिका कारने (एमएच ०९ एआर १०५२) वाशिम जिल्ह्यातील वारे येथे लग्नासाठी गेले होते. लग्न समारंभ संपवून ते दुपारी माळेगावकडे येत होते. हिंगोली ते कनेरगाव मर्गावरील चिंचाळा पाटीजवळ कार आली असता कार चालक आतारखान यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडवर जाऊन आदळली.

या भीषण अपघातात मुक्‍तारखान गफूरखान (वय -५५), अबूजरखान गफारखान (वय-१०), सादिकाबी जब्‍बारखान (वय-५५ तिघे रा. माळेगाव) यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर चालक अतारखान जब्‍बारखान पठाण (वय-३८), शेख वसीम शेख रसूल (वय-२५ दोघे रा. माळेगाव), नाजेमाबी असदखान (वय -५२ रा. पुसद) हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंगद सुडके, पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, विठ्ठल भडंगे, अशोक धामणे, राजू ठाकूर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तात्काळ हिंगोली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी झालेल्या तिघांची प्रकृती नाजूक असल्याने हिंगोली शासकीय रुग्णालयात प्रथामिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.