दुर्देवी ! सेल्फीच्या नादात तिघांचा नदीत बुडून मृत्यू

आग्रा : पोलीसनामा ऑनलाइन  –   पोहण्यासाठी यमुना नदीपात्रात उतरलेल्या तिघा मित्रांचा सेल्फीच्या नादात बुडून मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील एत्मदौला येथे रविवारी (दि. 11) ही दुर्दैवी घटना घडली. एका तरुणाचा मृतदेह सोमवारी सापडला असून उर्वरित दोघांचा शोध सुरु आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गौरव (वय 19), प्रेम शरण (वय 18), सुमित उर्फ कालू (वय 18 तिघेही रा. कौशलपूर) असे मृत तिघांची नावे आहेत. यातील सुमित उर्फ कालूचा मृतदेह सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहा तरुण रविवारी मौजमजेसाठी एत्मदौला परिसरातील यमुना नदीकाठावर गेले होते. यावेळी गौरव, प्रेम शरण आणि सुमित हे तिघे पोहण्यासाठी नदीत उतरले होते. तिघांनी सेल्फी काढून ते फोटो त्यांनी आपल्या मित्रांना पाठवले. तसेच सोशल मीडियावरही पोस्ट केले. पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले. त्यावेळी काठावर असलेल्या इतर मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत तिघेही बुडाले. दुर्घटनेबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तिघांचा शोध घेतला. मात्र, रात्र झाली तरी सापडले नाहीत. सोमवारी सकाळी पुन्हा पोलीस आणि स्थानिकांनी शोधमोहीम सुरू केली. यात एका तरुणाचा मृतदेह सापडला असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे.