कौतुकास्पद ! उपचाराअभावी आईचा मृत्यू, 3 मित्रांनी मिळून उभारलं Covid हॉस्पिटल

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – मित्राच्या आईला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात खाटांची उपलब्धता नसल्यानं वेळेत उपचार होऊ शकले नाही. जुजबी उपचारांवरच समाधान मानावं लागल्यानं तिनं मिरजेतील सरकारी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उपचाराविना मित्राला आई गमवावी लागल्याचं दु:ख पचवत तीन मित्र एकत्र आले. अशी वेळ इतरांवर येऊन नये यासाठी त्यांनी मिरज येथे आरफा हेल्थकेअर कोविड हॉस्पिटल सुरू केलं.

सेवाभावी वृत्तीतून सुरू केलेलं हे हॉस्पिटल आता मिरजेतील गरजूंसाठी आधार बनलं आहे. गेल्या महिन्यात सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला होता. रुग्णालयांमध्ये खाटांची उपलब्धता नसल्यानं अनेक रुग्णांवर घरीच उपचार करावे लागले. खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेशा ऑक्सिजनयुक्त खाटा आणि व्हेंटीलेटर नसल्यानं रुग्णांना प्राण गमवावे लागले. असाच प्रसंग मिरज येथील शकील पिरजादे यांच्यावर ओढवला. पिरजादे यांचे मित्र जमीर सनदी आणि मौलाना मुबारक हे आईला रुग्णालयात दाखल करण्यासाठी धडपडत होते. सांगली आणि मिरजेतील जवळपास सर्वच रुग्णालयांमध्ये विनंती करूनही आईसाठी खाट उपलब्ध झाली नाही. अखेर मिरजेतील सराकरी रुग्णालयात प्रवेश मिळाला. परंतु तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.

वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून पिरजादे यांच्या आईचा मृत्यू झाला. या घनटेनंतर हे तीनही मित्र अस्वस्थ झाले. अशीच अवस्था अनेकांची होती म्हणून त्यांनी गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. तीन मित्रांनी एकत्र येत हयात फाऊंडेशन आणि जमियत ए दर्दमंदाने इन्सानियत या संस्थांच्य मदतीनं त्यांनी आरफा हेल्थकेअर कोविड हॉस्पिटल सुरू केलं. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी हॉस्पिटल सुरू करण्याची परवानगी दिली. सोबतच मिरजेतील मार्केट यार्डमधील शेतकरी भवनाची जागा उपलब्ध करून देण्यासही मदत केली. जागा ताब्यात मिळताच त्यांनी ऑक्सिजनयुक्त 40 खाटांचं हॉस्पिटल सुरू केलं. दोन मिनी व्हेंटीलेटरही उपलब्ध केले.

या हॉस्पिटलमध्ये 14 डॉक्टर, 22 नर्सिंग स्टाफ आणि 12 स्वच्छता कर्मचारी आहेत. गेल्या 15 दिवसात 30 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर सध्या 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांसह नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहिल्यानंतर हॉस्पिटल सुरू केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं असा अनुभव शकील पिरजादे, जमीर सनदी आणि मौलाना मुबारक यांनी सांगितला आहे.