जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान जखमी

श्रीनगर : वृत्तसंस्था – सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या जम्मू जिल्ह्यात एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. मात्र यावेळी झालेल्या चकमकीत चार जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव जवानांनी उधळून लावला आहे. 2021 मध्ये पाकिस्तानकडून केले गेलेले हे पहिले मोठ शस्त्रसंधीचे उल्लंघन आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी जोरदार गोळीबार सुरू केला होता. या गोळीबारात सैन्याचे 4 जवान जखमी झाले. भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचे मृतदेह एलओसीवर पाकिस्तानच्या बाजुला पडले असून ते अद्यापही पाकिस्तानी सैन्याने उचललेले नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणांना अल-बद्रचे अतिरेकी आणि पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील फोनवरील चर्चेची ऑडिओ क्लिप मिळवली आहे. चर्चेत ते काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवण्याचा डाव आखत असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी अल-बद्र दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांची एक टीम आणि त्या व्यतिरिक्त आणखी आठ अतिरेक्यांना गेल्या दोन महिन्यांपासून विशेष प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती दिली आहे.