धक्कादायक ! चोर असल्याचे समजून महाराष्ट्रात ‘इथं’ जमावाकडून तिघांचा खून

पोलीसनामा ऑनलाइन – मोटारीतून चाललेले चोर असल्याचे समजून पालघरमध्ये जमावाकडून तिघांचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील ही दुर्देवी घटना घडली आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान दाभाडी – खानवेल मार्गावर नाशिककडून येणार्‍या एका वाहनाला केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ गावकर्‍यांनी रोखले. या प्रवाशांकडे विचारपूस केल्यानंतर गावकर्‍यांनी दगड आणि व इतर साहित्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती कासा पोलिसांनी दिली आहे.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहचला आहे. घटनास्थळी पोलिसांच्या वाहनांची नासधूस केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी डहाणू तालुक्यातील चारोटी गावाजवळ सारणी गावात देखील असाच एक प्रकार घडला होता. ठाणे येथील एका समाजसेवकाला मारहाण झाली होती. तसेच पोलिसांच्या गाडीवर व एका खासगी वाहनांवर दगडफेक करून वाहनांची नासधूस करण्यात आली होती.

कोरोनामुळे राज्यात असलेल्या टाळेबंदीच्या वातावरणात रात्रीच्या वेळी चोर व दरोडेखोर यांचा ग्रामीण भागात वावर होत असल्याची अफवा आहे. त्यामुळे काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच गुरूवारी रात्री गडचिंचले येथील ग्रामस्थांनी या मार्गावरून प्रवास करणार्‍या तीन व्यक्तींना चोर असल्याच्या गैरसमजातून दगड व इतर साहित्याने मारले आहे.