उत्तरेत वादळामुळे ६८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीसह उत्तरप्रदेश ,पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशला रविवारी पुन्हा एकदा धुळीच्या वादळाचा फटका बसला आहे. यात ६८ लोकांचा मुत्यू झाला असून बरेचजण जखमी झाले आहेत.

दिल्लीत रविवारी दुपारी अचानक वेगाने वारे वाहू लागले. काही ठिकाणी पावसाच्या सारी देखील कोसळल्या. काही वेळाने या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचे रूपांतर वादळामध्ये झाले. यात गुरुग्राम आणि दिल्ली-एनसीआर परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोलमडली. तर 40 हून अधिक विद्युत पोल पडले.सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस सुरु आहे, वाऱ्याच्या वेगाने लग्नसमारंभातले मंडपही कोसळले आहेत. आता हे वादळ ईशान्य भारताच्या दिशेकडे सरकले आहे. तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ओडीशात जोरदार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, या वादळी वारे आणि पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे काही काळ रद्द झाली होती. रस्त्यांवर वाहनेही अत्यंत धीम्या गतीने धावत होती. तर मेट्रो सेवाही बराच वेळ पूर्णपणे ठप्प झाली होती. दिल्लीतील वाहतूक ठप्प झाल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. इंद्रप्रस्थ करोलबागदरम्यान मेट्रो मार्गावर झाड पडल्याने मेट्रो सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे लोकांना पायी चालावे लागले त्यात वाऱ्याचा वेग जास्त असल्याने चालणाऱ्यांचाही खोळंबा झाला.

या वादळामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आणि ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळानंतर पंतप्रधान मोदीनी रात्री अकरा वाजून २५ मिनिटांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, देशाच्या काही भागात वादळामुळे जीवितहानी झाली आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सामील आहोत जखमींवर त्वरित उपचार केले जावेत तसेच आवश्यक ते मदतकार्य केले जाईल असे सांगितले आहे.