Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळे राज्यात यंदा व्याघ्र पर्यटनाच्या उलाढालीत 60 % घट

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे यंदा वन्यजीव पर्यटन व्यवसायातील महत्वाच्या काळातील उलाढालीवर सुमारे 60 टक्के फटका बसला आहे. वन्यजीव पर्यटनात सर्वाधिक पर्यटकांचा कालावधी हा एप्रिल ते जून असा असून, त्यानंतर पावसाळ्यात अभयारण्ये बंद असल्याने व्यवसाय ठप्प असतो. त्यामुळे यावर्षी वन्यजीव पर्यटन व्यवसायातील महत्वाच्या काळातील उलाढालीवर पाणी सोडावे लागले आहे.

लॉकडाउनपुर्वी मार्चच्या दुसर्‍या आठवडयात वन्यजीव पर्यटनावर बंदी घालण्यात आली. तर वन्यजीव पर्यटन पुढील आदेश येईपर्यंत बंदच ठेवण्याचे निर्देश राज्याच्या वनविभागाने दिले आहेत. त्यामुळे वर्षांतील सर्वाधिक काळ पर्यटक असणार्‍या या काळातच व्यवसाय ठप्प झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. वन्यजीव पर्यटन म्हणजे व्याघ्र पर्यटन ही संकल्पना सध्या रुढ असल्यामुळे एप्रिल ते जून या काळात व्याघ्र पर्यटनासाठी पूरक असणार्‍या विदर्भातील ताडोबा, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, टिपेश्वर या व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये पर्यटकांची गर्दी सर्वाधिक असल्याचे वन्यजीव पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.

हमखास होणारे व्याघ्र दर्शन आणि छायाचित्रणाची संधी यामुळे अर्ध्याहून अधिक पर्यटक हे ताडोबालाच प्राधान्य देतात. मात्रा, कोरोनामुळे पर्यटक आले नसल्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे. वनाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून या काळातील व्याघ्र पर्यटकांची संख्या सुमारे सव्वा लाख इतकी आहे. या काळात वनखात्यास प्रवेश शुल्क माध्यमातून मिळणारा महसूल (सुमारे चार ते साडेचार कोटी रुपये) हा वर्षांतील एकूण महसूलाच्या निम्मा असतो.

यावर्षी या महसूल मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पर्यटकांसाठी हॉटेल व्यवस्था, सफारीसाठी वाहन, वन्यजीव मार्गदर्शक या बहुतांश सुविधा स्थानिक पातळीवरील मनुष्यबळाच्या माध्यमातून पूर्ण होतात. राज्यातील महत्वाच्या व्याघ्र पर्यटनाच्या ठिकाणी मिळून दिवसाला सुमारे 200 सफारी होत असल्याचे वनाधिकार्‍यांनी सांगितले.