नवरात्रीचे उपवास करताय मग ‘या’ गोष्टीकडे द्या लक्ष, अन् रहा फिट

पोलीसनामा ऑनलाइन – नवरात्रोत्सवात काही लोक नऊ दिवस उपवास ठेवतात. या काळात सात्विक भोजन करून, शरीराला डिटॉक्स करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, बर्‍याच वेळा लोक उपवासाला फराळावर ताव मारतात आणि त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढते. आपल्यालाही या नवरात्रीतील उपवास करायचे असतील तर आम्ही काही टीप्स घेऊन आलो आहोत. ज्याचा अवलंब करून तुम्हीदेखील तुमचे वजन कमी करू शकता. उपवास करणे हा वजन कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

आधीच डाएट प्लॅन ठरवून घ्या
आधीच नियोजन न केल्याने आपण आयत्यावेली वेफर्स, खिचडी, चिप्स असे काहीहीपदार्थ फराळ म्हणून खातो. याचसाठी आपण उपवास करणार असाल तर, आधीच डाएट प्लॅन ठरवून घ्या. एकदिवस अगोदर डाएट प्लॅन निश्चित केल्यास आयत्यावेळी काहीही खाण्याची वेळ येणार नाही. डाएट प्लॅन बनवताना कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, फॅट आणि फायबर हे घटक योग्य प्रमाणात आहेत का, हे तपासा.

थोड्या-थोड्या वेळाच्या अंतराने खात राहा.
एकाच वेळी खूप खाण्यापेक्षा, थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने खात राहा. यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी प्रमाणात राहील आणि संपूर्ण दिवस तुम्हाला उत्साही वाटेल.

नारळ पाणी, फळांचा रस घ्या.
योग्य आहार जितका गरजेचा आहे, तितकेच शरीर हायड्रेटेड राहणे देखील गरजेचे आहे. शरीर हायड्रेटेड राहावे म्हणून, नारळ पाणी, ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी पीत राहावे. याने शरीरातील पाण्याची पातळी समतोल राखली जाईल.

चहा-कॉफीचे प्रमाण कमी करा.
चहा, कॉफीमध्ये कॅफेनचे प्रमाण अधिक असते. कॅफेनमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. म्हणून उपवासादरम्यान शक्यतो चहा-कॉफीचे सेवन कमी करावे,

हलका फराळ निवडा.
उपवासाच्या वेळी अनेक लोक वेफर्स, चिप्स, पुरी, बाजारात मिळणारा तयार रस, तळलेले पदार्थ खातात. परंतु, हे पदार्थ आपल्या शरीरासाठी घातक ठरतात. या ऐवजी फराळ म्हणून साबुदाणा खिचडी, भेळ, मखाणा किंवा चणे हे पदार्थ खाऊ शकता.