बँकांच्या नावाने येणारे बनावट कॉल आणि मॅसेजवर RBI ने व्यक्त केली चिंता, सांगितल्या ‘या’ सेफ्टी टिप्स, जाणून घ्या
नवी दिल्ली : सध्या रोजच बँकांच्या नावाने बनावाट कॉल किंवा मॅसेजद्वारे फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. सायबर गुन्हेगार बँकेच्या नावाने कॉल किंवा मॅसेज करून बँक खात्याशी संबंधीत गोपनीय माहिती मागतात आणि फसवणूक करतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नुकतेच अशाप्रकारच्या फसवणुकीबाबत इशारा जारी केला होता. नोटीसनुसार, बँका किंवा संस्थांच्या टोल फ्री नंबरच्या समान मोबाइल नंबरवरून फसवणूक केली जात आहे. आरबीआयने सांगितले की, फ्रॉड करणारे वित्तसंस्थांच्या टोल फ्री नंबरसारखे मोबाइल नंबर ठेवतात आणि संस्थेच्या नावाने ट्रूकॉलरसारख्या अॅपवर नंबर सेव्ह करतात.
भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एक इशारा जारी केला आहे. आरबीआयने आपल्या ट्विटर हँडलद्वारे सांगितले आहे की, ग्राहकांनी आपला पिन, ओटीपी आणि बँक खात्याशी संबंधी कोणतीही माहिती शेयर करू नये. केंद्रीय बँकेने म्हटले की, जर एखाद्या ग्राहकाचे कार्ड चोरी झाले किंवा हरवले तर ताबडतोब ते ब्लॉक करावे. याशिवाय ग्राहकाने कोणत्याही प्रकारचे केवायसी डिटेल्सशी संबंधीत माहिती मागितल्यास अलर्ट राहावे. अशी कोणतीही माहिती शेयर करू नये.
मागील काही दिवसापूर्वी आरबीआयने बँकेच्या नावाने येणार्या फ्रॉड फोन कॉलबाबत इशारा जारी केला होता. केंद्रीय बँकेने म्हटले होते की, समजा की बँकेतून येणार्या फोन कॉलचा क्रमांक 1600-123-1234 आहे. तेव्हा हे सायबर गुन्हेगार 600-123-1234 प्रमाणेच यासाठी नंबर घेतात आणि तो ट्रूकॉलर किंवा अन्य सेवा देणार्या अॅपवर बँकेचा टोल फ्री क्रमांक म्हणून रजिस्टर्ड करतात. यातून लोकांना समजत नाही की, हा कॉल बँक/वित्तसंस्थेकडून आहे किंवा एखाद्या फ्रॉड करणारा फोन करत आहे.
आरबीआयने म्हटले की, हे समजणे आवश्यक आहे की, कोणतीही वित्तसंस्था किंवा त्यांचे प्रतिनिधी ईमेल, एसएमएस किंवा व्हॉट्सअप संदेश पाठवत नाहीत किंवा व्यक्तिगत माहिती, पासवर्ड किंवा ओटीपी विचारण्यासाठी फोनवर कॉल करत नाहीत. अशाप्रकारचे ईमेल, एसएमएस, व्हॅट्सअप मॅसेज किंवा फोन कॉलला उत्तर देऊ नका. ग्राहकांनी कधीही कार्डाच्या पडताळणीसाठी एसएमएसच्या माध्यमातून मिळालेल्या लिंकवर क्लिक करू नये. ग्राहकांनी नेहमी आपल्या अधिकृत वेबसाइटवरून संपर्क डिटेलपर्यंत पोहचले पाहिजे आणि समस्येच्या वेळी त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी सुरक्षित साधनांचा वापर केला पाहिजे.