‘कोरोना’चे रुग्ण वाढल्याने ठाण्याची संपूर्ण लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असून मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्येचा आलेख वाढला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर संपुर्णः लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला जात आहे. असाच निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरी, वागळे इस्टेट, लोकमान्य-सावरकरनगर, घोडबंदरपाठोपाठ आता शहराच्या मध्यवर्ती भागातील खारकर आळी आणि जांभळीनाका परिसरातील घाऊक किराणा बाजारपेठ 17 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

ठाण्याचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळख असलेल्या खारकर आळीमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्याच परिसरात घाऊक किराणा बाजारपेठ आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे खारकर आळी, जांभळीनाका भागातील घाऊक किराणा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नौपाडयातील नागरिकांसाठी भगवती शाळेच्या मैदानात तात्पुरती भाजी मंडई उभारण्यात आली होती. ही भाजी मंडई बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. घोडबंदर परिसर 18 तारखेपर्यंत बंद करण्यात आला आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तू, दूध, भाजीपाला, फळे, बेकरी, चिकन आणि मटणाची दुकाने तसेच घरपोच सेवाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये बदल करण्यात आला असून जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्नधान्य, किराणा दुकाने, दूध डेअरी, औषधांची दुकाने सुरू राहणार आहेत, अशी माहिती पालिकेने दिली.