रेल्वे दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार – मुख्यमंत्री अमरिंदर सिंग 

अमृतसर : वृत्तसंस्था – अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री रेल्वे दुर्घटना घडली. रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण दुर्घटनेत 61हून अधिक जण ठार, तर 72 जण जखमी झाले असल्याचे समजते आहे. आता या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत.

चार वर्ष सत्तेत आहात मग राममंदीर का नाही झाले – राष्ट्रवादी नेते

पीडितांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश आहे. दु:खाच्या प्रसंगी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. रेल्वे प्रशासन तसेच अमृतसर रेल्वे प्रशासन एक-मेकांकडे बोट दाखवत आहे. कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. ‘मला ट्रेन पुढे नेण्यासाठी हिरवा कंदिल दाखवण्यात आला होता. सर्व मार्ग मोकळा आहे असे मला वाटले. रेल्वे रुळावर इतके लोक थांबले आहेत याची मला अजिबात कल्पना नव्हती’ असे  ड्रायव्हरने सांगितले होते. रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आयोजक हे पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. दरम्यान आयोजक भूमिगत झाल्याची माहिती आहे. अशातच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रेल्वे दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रेल्वे दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले.

या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचा आदेश दिला असून पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाईल. चार आठवड्यात अहवाल सादर केला जाईल, अशीही माहिती अमरिंदर सिंग यांनी दिली. तसेच, या दुर्घटनेतील पीडितांना मदत म्हणून राज्य सरकारने 3 कोटी रुपये दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.