‘महात्मा गांधींना ठार मारणारे हेच देशद्रोही’, काँग्रसचे मंत्री अस्लम शेख यांचा भाजपवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ठाकरे सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर ३४ दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी पार पडला. तिन्ही पक्षाच्या नेत्यांची या मंत्रिमंडळात वर्णी लागली. यात काँग्रेसच्या १० आमदाराचा समावेश आहे. मात्र, काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना दिलेल्या मंत्रिपदाच्या शपथविधीवरुन भाजप नेत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं होत. त्यावर आता मंत्री अस्लम शेख यांनी थेट दिल्लीतून प्रतिउत्तर दिलंय. ‘महात्मा गांधींना ठार मारणारे हेच देशद्रोही’ अश्या शब्दात अस्लम शेख यांनी उत्तर दिले आहे.

भाजपा खासदार किरीट सोमैय्या यांनी ट्विटवरुन एक व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले होते, ‘देशद्रोही आता देशभक्त झाले… उद्धवा, अजब तुझे सरकार’ अश्या शब्दात सोमय्यांनी टोला लगावला होता. सोमय्या म्हणाले कि, २०१५ च्या अधिवेशनावेळी सध्याचे मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी याकूब मेमनच्या मृत्युदंडाची शिक्षा माफ करण्याची मागणी केली होती. त्यावेळी, भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांनी त्यांच्या या मागणीचा कडाडून विरोध करत ६ वेळा महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन स्थगित केलं होतं, तसेच शेख यांना देशद्रोहीदेखील म्हटलं होतं. मात्र, आता त्याच अस्लम शेख यांना ठाकरे सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आलं. असे म्हणत सोमैय्या यांनी ट्विटरवरुन व्हिडीओ शेअर करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. सोमय्या यांच्या याच टीकेला अस्लम शेख यांनी प्रत्युत्तर दिलंय.

‘महात्मा गांधींना ठार मारणारे हेच देशद्रोही आहेत, अश्या शब्दात अस्लम यांनी प्रत्युत्तर दिले. मला मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने यांच्या पोटात दु:खत आहे. हे महात्मा गांधींना ठार मारणारे लोकं आहेत, हेच नथुराम गोडसेंचं मंदिर उभारणारे भाजपावाले आहेत, असे म्हणत अस्लम शेख यांनी किरीट सोमैय्यांच्या टीकेला उत्तर दिलंय. दरम्यान, अस्लम शेख यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित मंत्र्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना अस्लम शेख यांनी भाजपा नेत्यांच्या टीकेला उत्तर दिले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/