भाजपने स्वत: आत्मचिंतन करावे ; ‘विधान परिषदेचा निकाल म्हणजे ‘रिक्षाने’ बुलेट ट्रेनला हरवले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारून भाजपचा धुव्वा उडवला आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपलीय. याचदरम्यान आता परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

एका वृत्तावाहिनीशी बोलताना अनिल परब म्हणाले, आजचा विधान परिषदेचा निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले आहे. अमरावती ही जागा आम्ही हरलो. पण, ही जागा आमची नव्हती. अमरावतीची जागा ही नेहमी अपक्ष जिंकत आले आहेत. आम्हाला सांगण्यापेक्षा भाजपने आत्मचिंतन करावे. अनेक वर्षे जिंकणाऱ्या दोन जागांवर ते हरले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. तसेच भाजपला जोरदार धक्का देऊन घवघवीत यश मिळवले आहे, तर दुसरीकडे पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला लक्ष्य केले जातेय.

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रितपणे आमच्याशी लढत दिलीय. यामुळे या निकालात काहीही धक्कादायक असे घडलेले नाही. हे होणारच होते. परंतु, तरीही भाजपने महाविकास आघाडीला कडवी झुंज देत चांगली लढत दिली आहे. निकालात मुद्दा असा की, शिवसेनेला काय मिळालं? याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांची अमरावतीची जागा गेली.

याउलट या निकालात भाजपला निदान धुळे-नंदुरबार मतदारसंघामध्ये केवळ विजय मिळविता आला. मात्र, शिवसेनेचे काय ? शिवसेनेने अमरावतीची एकमेव जगादेखील गमावलीय. पण, या निवडणुकीमध्ये सर्वाधिक फायदा झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा. त्यांनी पुणे, औरंगाबाद व अप्रत्यक्षरीत्या अमरावती शिक्षक मतदारसंघात विजय प्राप्त केला आहे. माझे या तिघांना पण थेट आव्हान आहे की, हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने आमचा सामना करावा. मात्र, त्या तीन पक्षांत हिंमत नसल्याचे स्पष्ट आहे.

आम्ही आघाडी करून लढायचे की, एक एकट्याने याचा निर्णय आघाडीतील सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला कुणी बिनकामाचा सल्ला देण्याची काहीही गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. एकत्रितपणे लढण्याचे परिणाम या निवडणुकीच्या निकालातून समोर आला आहे.

सर्वच मतदारसंघामध्ये आघाडीतील पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केले. त्यामुळे पुढील काळात अधिकाधिक आघाडीचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या वेगळे लढण्याने जर विरोधकांचा फायदा होणार असेल तर तसे अजिबात होता कामा नये, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवली, तर महाविकास आघाडीकडून त्यांचा पराभव होईल.