ह्दयद्रावक घटना ! वीज पडल्याने घर कोसळून २ बालकांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मेघगर्जनेसह सुरु असलेल्या जोरदार पावसात वीज घरावर पडल्याने घर कोसळल्याने त्याखाली सापडून दोन लहान मुलांचा गाडून मृत्यु झाला. त्यांची आजीही या वेळी गंभीर जखमी झाली. ही घटना ओतूर परिसरातील तेलदरा येथे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

कार्तिक गोरख केदार (वय २ वर्षे), वैष्णवी विलास भुतांबरे (वय ६, दोघेही रा. तेलदरा, ओतूर) अशी मृत्यु झालेल्या मुलांची नावे आहेत. तर चिमाबाई बापू केदार (वय ६०) असे जखमी महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओतूर परिसरात सोमवारी सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह वीजांचा कडकडाट सुरु होता. त्याचवेळी ओतूर परिसरातील तेलदरा वस्ती येथील ठाकर समाजाच्या आदिवासी वस्तीतील एका बांधकामाच्या घरावर वीज कोसळली. त्यामुळे संपूर्ण घर कोसळले. यावेळी घरामध्ये असलेले कार्तिक केदार आणि वैष्णवी भुतांबरे या दोन्ही मुलांचा भिंतीखाली सापडून मृत्यु झाला. तर घरातच असलेल्या आजी चिमाबाई या गंभीर जखमी झाल्या.

वीज कोसळल्यानंतर घर पडल्याच्या आवाजाने ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यांनी तिघांनाही तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टर तपासणीपूर्वीच मुलांचा मृत्यु झाला होता. आजी चिमाबाई यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुण्यातील रुग्णालयात पाठविले.