सेल्फीचा मोहापायी दोघांना जलसमाधी

पोलिसनामा ऑनलाईन – तलाव परिसरात आलेल्या मित्रांना सेल्फी काढायचा मोह जीवावर बेतला आहे. तलावाच्या काठावर उभे राहून सेल्फी घेत असताना पाचही जण पाण्यात पडले. त्यापैकी दोघांना जलसमाधी मिळाली तर तिघे बचावले आहेत. कारंजा तालुक्यातील उमरी येथील पाच जण धावसा (हेटी) येथील तलाव परिसरात ही घटना घडली. तेजस राजू चोपडे (वय 15) आणि हर्षल संजय चौधरी, (दोघेही रा. उमरी) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी काढण्यासाठी उमरी येथून हे मित्र धावसा (हेटी) येथील तलावावर आले होते. काही काळ सगळे तलाव परिसरात फिरले. त्यांनी फोटोसेशनही केले. परंतु सेल्फी काढताना संपूर्ण तलाव मागे दिसावा असा काहींचा आग्रह होता. सेल्फीच्या नादात तलावात असलेल्या पाणीपुरवठा विहिरीच्या बाजूला खोल खड्डयाजवळ सेल्फी काढत असताना एकाचा पाय घसरला. यावेळी उपस्थित चौघांनी एकमेकांचे हात धरून साखळी करून वाचवायचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पाचही तलावात पडले. धावसा (हेटी) येथील एक मित्र हर्षल धनराज कालभूत बाहेर काही अंतरावर उभा होता. हा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्यानं मोठी हिंमत दाखवत एक-एक करीत तिघांना बाहेर काढले. मात्र, दोघांना वाचवण्यात त्याला यश आले नाही.