पब्जी गेम खेळण्यात मग्‍न असलेल्या दोन मित्रांना रेल्वेने चिरडले

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – पब्जी गेम खेळण्याचे वेड तरूणांना लागले आहे. पब्जी खेळताना यापुर्वी अनेक दुखःद घटना घडल्या आहेत. तरी देखील तरूण मंडळी पब्जी खेळण्याचा नाद काही सोडत नाहीत. पब्जी गेम खेळताना हिंगोलीतील दोन मित्रांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. पब्जी खेळताना दोघा मित्रांना रेल्वेने चिरडल्याची घटना घडली आहे.

नागेश मोरे (22) आणि स्वप्नील अन्‍नपुर्णे (23) अशी त्यांची नावे आहेत. हिंगोलीतील खटकाळी बायपास रोडलगत असलेल्या रेल्वे रूळावर बसुन मोबाईल पब्जी गेम खेळतानांचा त्यांना जीव गमवावा लागला आहे. ही घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर नागरिकांनी मोठया प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली होती. नागेश आणि स्वप्नील हे हनुमान नगर परिसरात रहावयास असल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वे रूळाजवळ दुचाकी पार्क करून ते रूळावर बसुन मोबाईलवर पब्जी गेम खेळत होते. त्यावेळी अचानकपणे अजमेर-हैदराबाद ही रेल्वे आली आणि रेल्वेने त्यांना चिरडले. सर्वत्र अंधार असल्याने काही वेळानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, काही वेळानंतर रेल्वे ट्रॅकवरून दुसरी रेल्वे आली. स्थानिकांनी ती रेल्वे थांबविली आणि रेल्वे रूळावरील मृतदेह बाजुला काढले. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.