अहमदनगर : ट्रकने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर- दौंड महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे हा अपघात झाला.

सुनील कासार (वय- ४० रा. वडाळा महादेव ता. श्रीरामपूर), मोहन सुलसाने (रा. गौतमनगर, श्रीरामपूर) ही मयतांची नावे आहेत.  याबाबत माहिती अशी की, कासार व सुलसाने हे दोघे सकाळी सव्वाआठच्या सुमारास दुचाकीवर दौंडवरून नगरच्या दिशेने जात होते. लोणी व्यंकनाथ शिवारात पाऊस सुरू झाल्याने ते दुचाकी थांबवून रस्त्याच्या कडेला उभे राहीले. त्याच दरम्यान नगरहून दौंडच्या दिशेने भरधाव चाललेल्या ट्रक चालकाने (एम.एच.१५ एके-७८९) दुसरा ट्रक ओव्हरटेक करण्याच्या नादात असताना दोघांना चिरडले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Visit – policenama.com