जम्मू-काश्मीरमध्ये चकमक ; २ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : वृत्तसंस्था – गेल्या पाच दिवसात दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये २० ठिकाणी ग्रेनेड हल्ले केले असून संपूर्ण काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्च मोहिम सुरु करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील राजपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. खात्मा करण्यात आलेले हे दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेतील असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. पुलवामामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये गुरुवारी पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या ग्रेनेड हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवानांसह पाच जण जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या ५ दिवसांत काश्मीर खोºयात दहशतवाद्यांनी २० हून अधिक वेळा ग्रेनेड हल्ले केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ग्रेनेड हल्ला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केला आहे. यापूर्वी झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेने घेतली होती.