विद्यापीठांच्या परीक्षाबाबत उदय सामंत यांचे मोठ विधान, म्हणाले…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाची ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीबीएससी बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षाचे काय होणार हा अनेकांना प्रश्न पडला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षांबाबत मोठ भाष्य केले आहे. अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. जिथे नेटवर्क पोहोचत नाही तिथे ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच परीक्षा कशा घ्यायच्या हा त्या-त्या विद्यापीठाचा निर्णय आहे. सोलापूरसारख्या विद्यापीठात परीक्षा घेऊन झाल्या आहेत. तिथे ते निकालापर्यंत पोहोचल्याचे सामंत यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कठोर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत आहेत. त्यांच्या निर्णयाचे स्वागतच आहे. यावेळी सामंत यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि शिक्षकांच्या लसीकरणावर भाष्यं केले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतील 45 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या शिक्षकांच्या लसीकरणास यापूर्वीच सुरुवात केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांत शिकवणाऱ्या शिक्षकांना लस देण्यासाठी सुरुवात झाली आहे. सध्यातरी जिल्हा बंदी नाही. पण प्रवासासाठी कठोर निर्बंध घातले आहेत. ज्यांना कोकणात प्रवास करायचा असेल तर त्यांनी आधी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे ते म्हणाले.