UGC नं दिलेल्या निर्णयानुसार सप्टेंबरपर्यंत परीक्षा अशक्य : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) ने काढला आहे. पण यूजीसीने काढलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रात सप्टेंबर पर्यंत परीक्षा घेणं शक्य नसल्याचं मत गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

उदय सामंत म्हणाले, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत आम्ही राज्यातील सर्व कुलगुरू आणि विविध शैक्षणिक संस्थाचे संचालकासोबत चर्चा केली. त्या चर्चेत ३० सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येणार नसल्याच्या प्रतिक्रिया सर्व कुलगुरू आणि आणि शिक्षक संचालकांनी दिल्या. म्हणून अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यूजीसीसोबत पत्रव्यवहार करुनच राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, असं देखील सामंत यांनी बोलताना स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील सर्व कुलगुरू आणि अनेक तज्ज्ञांशी बोलल्यानंतर परीक्षा रद्द करण्याबाबतच मत मांडल होत. यासंदर्भांत आपत्कालीन समितीची सुद्धा बैठक झाली होती. यामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत यूजीसीला पत्र पाठवण्यात आलं होत. पण तरी देखील यूजीसीने परीक्षा घ्या असे आदेश विद्यापीठांना केले. यूजीसीच्या या निर्णयावरती उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी यूजीसीने राज्यातील सर्व विद्यापीठांना पत्र पाठवत गाईडलाईन्स पाठवल्या आहेत. सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश यूजीसीने दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांसमोर पुन्हा एक संभ्रम निर्माण झाला आहे. भूषण पटवर्धन यांनी बोलताना म्हटलं की, सप्टेंबर महिन्यात परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमात ठेवायचं असच चित्र असल्याचं सावंत यांनी म्हणत यूजीसीवर टीकास्त्र सोडलं आहे.