संजय राऊतांच्या प्रश्नावर खा. उदयनराजेंचं ‘उत्तर’, शिवसेनेला देखील केलं ‘टार्गेट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रेकॉर्डवर फक्त शपथ जाईल, असं सभापतींनी सांगितलं. त्याच्यावर वाद विवाद होत आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाने खूप राजकारण झाले. शिवाजी महाराजांचा अपमान झाला असता तर मी गप्प बसलो नसतो. तिथल्या तिथे राजीनामा दिला असता. व्यंकय्या नायडू हे काहीही चुकीचे वागले नाहीत, अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. तसेच व्यंकय्या नायडू यांना प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी प्रश्न उपस्थित केला त्या पक्षाच्या खासदारांना विचारावा, शरद पवारांना विचारावा ? असे त्यांनी म्हटले. तर संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना ते महान व्यक्ती असल्याचा उपरोधक टोला उदयनराजे यांनी लगावला.

राज्यसभेत बुधवारी नवनिर्वाचीत खासदरांना शपथ देण्यात आली. यावेळी जय भवानी जय शिवाजी घोषणेवरुन महाराष्ट्रात राजकारण रंगू लागल्यानंतर सभागृहात त्यावेळी नेमकं काय झालं याची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली. गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो फक्त जे राज्यघटनेत नाही, त्याला घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यावरून भाजपला लक्ष्य केलं होतं.
भाजपचं ‘तोंड बंद’ आंदोलन सुरु

खासदार संजय राऊत यांनी ट्विटकरून म्हटले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वशंजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे ? असा सवाल करत भाजपचे या विषयांवर ‘तोंड बंद’ आंदोलन सुरु झालं आहे. तर दुसरीकडे संभाजी भिडे यांच्याकडून सांगली आणि सातारा जिल्हा बंदची घोषणा अद्याप झालेली नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर उदनराजे भोसले यांनी उपरोधात्मक टीका केली.

काही लोकांना लाईमलाईटमध्ये जायचं असतं

महान व्यक्ती बाबा…राजकारण करण्यासाठी आमच्याकडे, शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील आहेत की नाहीत, याचे दाखले मागितले त्यांनी अशी मागणी करावी, व्वा ? मी त्यांच्याबद्दल काही उत्तर देणार नाही, काही लोकांना लाईमलाईटमध्ये यायचं असतं, असे म्हणत संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर उत्तर देणं त्यांनी टाळलं. मात्र, त्यांनी शिवसेनेला टार्गेट केलं.

तर ठाकरेसेना नामकरण करावं

शिवसेना हा महाराजांच्या नावावर आधारीत पक्ष आहे, यापूर्वीही आव्हाड आणि त्या लोकांनी मला डिवचले. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली. बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब ? कारण, शिवसेना भवनावर महाराजांची प्रतिमा वर पाहिजे होती, पण तिथे बाळासाहेबांची प्रतिमा आहे. यावर का बोलत नाही. जर बाळासाहेब मोठे असतील तर शिवसेनेने ठाकरेसेना हे नाव ठेवावं. मी द्वेषापोटी म्हणत नसून आय एम टॉकींग अबाऊट लॉजिक, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.