अहमदनगर : वृत्तसंस्था – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीमुळे विलीनीकरणाबाबत उठलेल्या वावड्या आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात सुरु झालेल्या चर्चेवर भाष्य करताना खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र विलीनीकरणाबाबतचा निर्णय परस्पर घेता येणार नाही अशी रोखठोक भूमिका मांडल्याने नव्या चर्चेला ‘आमंत्रण’ मिळाले आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उदयनराजे भोसले नगर जिल्ह्यातील चौंडी इथे आले होते. यावेळी त्यांना एका वृत्तवाहिनेने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही भूमिका मांडली.
उदयनराजे म्हणाले की ‘विलीनीकरण करायचं झालं तर ‘कोणाबरोबर’ करायचं आणि ‘का’ करायचं याबाबत चर्चाविनिमय होणं गरजेचं आहे. मला याबाबत काही माहिती नाहीये, आणि आमच्याशी याबाबत चर्चाही झालेली नाही.’ याबाबतचा जो निर्णय असेल तो चर्चा करूनच घेतला जाईल, परस्पर निर्णय घेता येणार नाही असं ते म्हणाले.