Udayanraje Bhosale | शासकीय मंजुरीनंतर एकाच प्रकल्पाच्या श्रेयवादासाठी दोन राजेंमध्ये लढाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सातारकरांना कास धरणातून पाणीपुरवठा करता यावा, यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या जलवाहिनी प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे. सुमारे १०२ कोटींच्या प्रकल्पासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. पण, आता खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनी निधी आणल्याचा दावा केला आहे. यामुळे कासच्या पाण्यावरून सातारच्या धर्तीवर श्रेयवादाची लढाई सुरू होण्याची लक्षणे आहेत.

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेतून तांत्रिक मान्यता घेऊन, सादर केलेल्या कास धरण ते पॉवर हाऊसपर्यंत अतिरिक्त गुरुत्व नलिका टाकण्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. १०२ कोटी ५६ लाखांच्या कामास मंजुरी मिळाल्यामुळे या कामाची सुरुवात करण्यात येईल. कास धरणाची उंची वाढवल्यामुळे पूर्वीच्या पाणीपातळीपेक्षा आताची पाणीपातळी पाच पटीने वाढून ५०२ दशलक्ष घनफूट झाली आहे.

नगरपरिषदेने पाण्याच्या प्रवाहाचा दाब वाढला म्हणून सध्याच्या जलवाहिनीशिवाय आणखी एक वाहिनी टाकण्याचा प्रस्ताव सादर केला होता. यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयाचे मंत्री हरदीपसिंह पुरी यांची भेट घेऊन योजनेला मान्यतेची मागणी उदयनराजे भोसलेंनी केली होती. त्यामुळे कास धरण ते पॉवर हाऊस अशी २७ किलो मीटरची नवीन अतिरिक्त जलवाहिनी टाकण्याबरोबर, १६ एमएलडी क्षमतेचा जल शुद्धीकरण प्रकल्प; तसेच वीजनिर्मिती केंद्र येथे १० लाख लिटर्स क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धिपत्रकात दिली.

तसेच, नवीन जलवाहिनी पूर्ण झाल्यानंतर एकूण ४४ एमएलडी शुद्ध, स्वच्छ पाणी नगरपरिषदेस उपलब्ध होईल. या नवीन अतिरिक्त जलवाहिनीच्या १०२ कोटी ५५ लाख खर्चापैकी सुमारे ३४ कोटी केंद्र शासन, तर राज्य शासन ५३ कोटी देणार आहे. तर, सातारा नगरपरिषद लोकवर्गणी उभी करून सुमारे १५ कोटी रुपये या प्रकल्पासाठी देणार आहे, असे खासदार उदयनराजेंनी स्पष्ट केले आहे.

मात्र, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनीही अशाच प्रसिद्धिपत्रकाद्वारे याच प्रकल्पाबद्दल माहिती दिली आहे.
शिवेंद्रसिंहराजे यांचे पत्रक म्हणते, कास धरणाची उंची वाढवल्यानंतर सातारकरांना मुबलक पाणी मिळण्यासाठी
कास ते सातारा अशी नवीन मोठ्या क्षमतेची जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्र व इतर तत्सम बाबी करणे
आवश्यक होते. या नवीन पाणीपुरवठा प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या अमृत अभियानातून १०२.५६ कोटी रुपये
निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीमध्ये ५२.९९ कोटी निधी हा राज्य शासनाकडून देण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. पाणीपुरवठा प्रकल्पासाठी मंजूर १०२.५६ कोटी निधीतून कास धरण ते सातारा
अशी नवीन वाढीव क्षमतेची जलवाहिनी टाकणे, मार्गावर येणाऱ्या ओढ्या नाल्यांवर आरसीसी बांधकाम करून
पाणी पुढे नेणे, सांबारवाडी येथे वाढीव क्षमतेचे जलशुद्धीकरण बांधणे, अशी विविध कामे होणार आहेत.
राज्य शासनाच्या भरीव निधीमुळे केंद्र शासनाने अमृत अभियानातून पाणीपुरवठा प्रकल्पासाठीही निधी उपलब्ध
करून दिला आहे. राज्य शासनाच्या मोलाच्या आर्थिक साह्यामुळे कास धरणाचे मुबलक पाणी सातारकरांना
मिळणार आहे.

त्यामुळे आता या प्रकल्पासाठी नवी श्रेयवादाची लढाई सुरू होतेय की काय, असा प्रश्न जाणकारांना पडला आहे.

Web Title :-Udayanraje Bhosale | 102 crore work sanctioned for new water supply channel from kas dam the claim of udayanaraje bhosale and shivendrasimharaje bhosale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nilesh Lanke | भाजपच्या “या” नेत्याच्या आश्वासनानंतर महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे नीलेश लंकेंचे उपोषण मागे

Ramdas Athawale | सुषमा अंधारे आधी आमच्या पक्षात होत्या; टीका करण्यासाठी शिवसेनेने त्यांना पक्षात घेतले – रामदास आठवले