खा. उदयनराजेंची राज्य सरकारवर टिका ; म्हणाले, ‘राजेशाही’ असती तर…

मुंबई : वृत्तसंस्था – नेहमी वादग्रस्त तसेच धाडसी विधान करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा विधान करून भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ते गुरुवारी पंढरपूरमध्ये आले होते.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आज जर राजेशाही असती तर दुष्काळ निवारणाचे निर्णय घेऊन रिकामा झालो असतो. सध्याचे सत्ताधारी दुष्काळाबाबतचे प्रश्न सोडवण्यात कमी पडत असल्याची टीकाही त्यांनी या सरकारवर केली.

त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुमच्या नावाचा विचार केलं जात असल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना म्हटलं कि, मुख्यमंत्री करायचे होते तर ते पंधरा वर्ष आगोदर करायला हवे होते. तसेच मुख्यमंत्री बनून एकाच जागी काम करायला मी काही कारकून नाही, असेदेखील ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर नीरा कालव्याच्या पाण्यावर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर देखील त्यांनी भाष्य केले.

दरम्यान, या निर्णयावर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर देत म्हटले कि, विधानपरिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे सर्वेसर्वा रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता उदयनराजेंनी त्याच्यावर टीका केली. लोकांच्या जमिनी हडप करण्यासाठी त्यांनी केवळ हे पाण्याचे राजकारण केल्याचा आरोप देखील त्यांनी रामराजेंवर केला. त्यामुळे आता त्यांच्या या आरोपांवर रामराजे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.