भूमिपूजनावरून संत समितीचा तोल सुटला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली असभ्य भाषेत टीका

 नवी दिल्ली : वृत्त संस्था – अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून अखिल भारतीय संत समितीचा टीका करताना तोल सुटलाय. या समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असभ्य भाषेत टीका केलीय. यामुळे आणखी राजकारण तापलं आहे.

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावा, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. मात्र, यावरून हिंदू साधू-संतांच्या अखिल भारतीय संत समितीने ठाकरेंवर असभ्य भाषेत टीका केलीय.

सरचिटणीस जितेंद्रनंद सरस्वती म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावर उद्धव ठाकरे यांनी कब्जा केलाय. उद्धव ठाकरे कॉन्व्हेंट शाळेत शिकले आहेत. त्यांना काय माहिती व्हर्च्युअल आणि वास्तविक पूजेतला फरक?

वडिलांच्या वारशावर पात्र नसलेला मुलगा बसलाय. त्याना धर्म- आध्यात्माची भाषा ही राजकारणी वाटत आहे, हेच दुःखद आहे. इटालियन बटालियनच्या आश्रयाला गेल्याने यांचं वेगळं काय होणार?. अपात्र असलेल्या मुलाने वडिलांच्या वारशावर ताबा मिळवला असून राजकीय आणि धर्मिक भाषेची तुलना केली जातेय. अशा व्यक्तीकडून काय अपेक्षा करणार? असेही सरस्वती म्हणालेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम राम मंदिराला पाठिंबा दिला होता. पण, उद्धव ठाकरेंचे शिक्षण हे मिशनरी शाळेत झाले. यामुळे त्यांना काय कळणार वास्तविक भूमिपूजन आणि व्हर्च्युअल भूमिपूजेतला फरक?. भूमिपूजन मातृभूमीला स्पर्श न करता कसे काय पूर्ण होईल? असा सवाल देखील सरस्वती यांनी उपस्थित केला.

राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभाला अनेकजण येणार आहेत. अयोध्या ही भविष्यातील भारताची अध्यात्मिक राजधानी असणार आहे. यामुळे भूमिपूजन बदल स्वीकारणे अशक्य आहे. या कार्यक्रमाला अनेक उद्योगपती येणार असून त्यांनी अयोध्येचं रुप बदलावं. या भूमीला राम राज्याची अनुभूती करून द्यावी. हेच या भूमिपूजनाचे उद्दीष्ट आहे, असंही सरस्वती म्हणाले.