…तर पोलिसांवरही कारवाई करू : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी, असे आदेश गृह विभागाला दिले आहेत. महिला आणि बालकांची सुरक्षितता हा शासनच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून त्यात हयगय करणाऱ्यांना माफी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पोलीस यंत्रणेतील कोणतीही व्यक्ती, मग ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी जे या कामात टाळाटाळ करतील किंवा विलंब लावतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. घडलेल्या गुन्ह्यांचा एफआयआर तात्काळ नोंदवणे, लवकरात लवकर तपास सुरु करणे, गुन्हा सिद्धतेसाठी आवश्यक असलेले पुराव्यांचे संकलन करणे, न्यायालयात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करणे, परिपूर्ण पुराव्यांसह या केसेस न्यायालयात अभ्यासपूर्ण रितीने मांडणे या सगळ्या गोष्टीसाठी शासन महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून त्यादृष्टीने त्यांना आवश्यक असलेले कायदेविषयक संरक्षण आणि सहकार्य पुरवणार आहे. यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणेला अधिक सजग आणि दक्षपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महिला पोलीस ठाण्यासाठी चाचपणी
महिलांना मोकळेपणाने आपल्यावरील अत्याचाराची महिती पोलीस ठाण्यात येऊन नोंदवता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस ठाणी सुरु करण्यासंबंधी गृह विभागाने चाचपणी करावी असेही आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गुन्हा सिद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न
महिला अत्याचाराच्या घटनेत न्यायालयात प्रकरणे दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल लागण्यास खुप विलंब लागतो. यामुळे महिलांचा आत्मविश्वास डळमळायला लागतो. असे होऊ नये, गुन्हेगारांवर वेळीच कारवाई होऊन त्यांच्यावर जरब बसावा यासाठी महिला अत्याचाराच्या केसेस लवकरात लवकर निकाली लावण्यासाठी राज्यशासन फास्ट ट्रॅक कोर्ट, विशेष न्यायालयांची स्थापना या सारख्या गोष्टी प्राधान्याने हाती घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.