ठाकरे सरकारकडून फडणवीस सरकारच्या निर्णयाला ‘ब्रेक’, सरपंच निवडीबाबत केला ‘हा’ निर्णय रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जनतेतून सरपंच निवड बंद करण्याचा निर्णय आज ठाकरे सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. या निर्णयामुळे आता ग्रामपंचायत सदस्यांतून सरपंच निवडला जाणार आहे.

सरपंच थेट जनतेतून निवडावा यासंबंधित निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता परंतु हा निर्णय धुडकावून आता नव्या सरकार हा कायदाच रद्द केला आहे. असे असले तरी महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेची मागणी आहे की सरपंच जनतेतून निवडला जावा. सरकारच्या या निर्णयाला सरपंच संघटनेतून विरोध होत आहे.

या बैठकीत सरपंच पदाच्या निवडीसह अध्यापकांसाठी प्रशिक्षण संस्था स्थापण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय व अशासकीय संस्थांमधील शिक्षकीय, समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे देखील ठरवण्यात आले. याशिवाय पीएचडीधारक अध्यापकांना 1996 पासून दोन वेतनवाढ देण्यावर देखील एकमत झाले आहे.

मंत्रिमंडळ निर्णयाव्यतिरिक्त काही निर्णय आज ठाकरे सरकारने घेतले आहेत. सारथी संस्थेतील अनियमिततेची चौकशी होणार असल्याचे देखील ठाकरे सरकारने स्पष्ट केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा