यामध्ये भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, गोहत्येच्या अफवेमुळे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये सोमवारी उद्रेक झाला आणि त्यात एका पोलीस अधिकाऱयासह एका तरुणाचा बळी गेला. बुलंदशहर येथे तीन दिवस एक धार्मिक कार्यक्रम झाला. त्याचा सोमवारी शेवट होता. त्याचवेळी गोहत्या झाल्याची अफवा परसली आणि जे व्हायचे तेच झाले.
आपल्या देशात शेतातील पीक अनेक कारणांनी येत नाही, पण अफवांचे पीक तरारून येते. पुन्हा या अफवांच्या बाजारात आपला हात धुऊन घेणारे नामानिराळे राहतात. बुलंदशहरात गोहत्येच्या संशयावरून जो हिंसाचार झाला त्यातही असेच काही घडले आहे का? या हिंसाचाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी कोणाचा गेम केला आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. २०१४ ची पुनरावृत्ती २०१९ मध्ये होण्याची शक्यता नाही. सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे कैराना लोकसभा पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे.
गोहत्येचे हे संशयपिशाच्च देशात आणखी किती जातीय हिंसाचार घडवत राहणार आहे? किती निरपराध्यांचे बळी त्यात जाणार आहेत? गोमाता हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय जरूर आहे, परंतु ज्या गाईच्या पोटात ३३ कोटी देव वास्तव्य करतात त्या गाईच्या नावाने माणूस दानव बनून उन्माद कसा करू शकतो? हे कोणत्या धर्मतत्त्वात बसते? गोहत्या केल्याचा किंवा गोमांस जवळ बाळगल्याचा केवळ संशय हा एखाद्याचा बळी घेण्याचा परवाना कसा ठरू शकतो? अशा प्रश्नांचा भडीमार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.