‘शिवसेनेनं मागितले 48 तास, राज्यपाल देतात 6 महिने’ : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आम्ही सत्ता स्थापनेसाठी राज्यापालांकडे 48 तास मागितले परंतु त्यांनी आम्हाला 6 महिने दिले असं वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना टोला लगावला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यपालांनी प्रथम भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. भाजपने 105 जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता. भाजपला 48 तास मिळूनही भाजप सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नाही. यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं. परंतु आम्हाला 24 तासांचाच वेळ देण्यात आला. राज्यात सरकार स्थापन करणं ही गोष्ट वाटती तेवढी सोपी नाही. त्यामुळे आम्हाला जास्त कालावधीची आवश्यकता होती. कारण दोन भिन्न विचारधारा असणाऱ्या पक्षांशी आम्हाला चर्चा करायची होती. अनेक मुद्द्यांचं स्पष्टीकरण आम्हालाही हवं आहे त्यांना हवं आहे. त्यासाठी वेळ लागत आहे. आम्हालाही 48 तास हवे होते.”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आम्ही सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे 48 तास मागितले होते. परंतु राज्यपाल खूप दयाळू आहेत, ते म्हणाले की तुम्हाला 48 तासांचा वेळ कमी पडेल. मी तुम्हाला 6 महिन्यांचा कालावधी देतो.” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

युती का तुटली? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी या प्रश्नाला बगल दिली.

Visit : Policenama.com