ठाकरे सरकारचा फडणवीसांना आणखी एक ‘धक्का’, ‘या’ विभागातील नियुक्त्या रद्द केल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून मागील सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना महाविकास आघाडीच्या सरकारने स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. तसेच तत्कालीन सरकारने केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचे सत्रच ठाकरे सरकारने सुरु केले आहे. यातच उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्त केलेल्या समित्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

विधानभवनात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीदरम्यान उदय सामंत म्हणाले की, उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून वेगवेगळ्या समित्यांवर सदस्य म्हणून अशासकीय सदस्यांची नियुक्ती ही केली जात असते. तर अशा समित्या या रद्द करण्यात याव्यात आणि नवीन अशासकीय सदस्य नियुक्त समित्या गठित करण्याचा प्रस्ताव तयार करावा असा आदेश उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

तसेच राज्यातील ग्रंथालयाची पडताळणी करुन नवीन अत्याधुनिक सुविधासह ग्रंथालये असावेत. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या महाविद्यालय, विद्यापीठे यांच्या मैदानात विविध अतिक्रमणे केली जात आहेत. हे तातडीने थांबवण्यात यावे. तसेच ज्या महाविद्यालयांना, वसतिगृहांना ३० वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यांचे संरचनात्मक लेखा परिक्षण करण्यात यावे आणि विद्यापीठाने रिक्त पदांचा अहवाल शासनाला तातडीने सादर करावा, अशा विविध सूचना देखील मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठाचे कुलगुरू हे संघाच्या विचारांचे असल्याने अशा घडल्या. या घटना टाळायच्या असतील तर कुलगुरु आणि प्र कुलगरु यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. ‘जेएनयूमध्ये जो प्रकार घडला त्यावेळी एबीव्हीपी आणि भाजपच्या गुंडांना नक्कीच तेथील विद्यापीठ प्रशासनाची मदत मिळाली असणार आहे. जेएनयूचे कुलकुरु जगदीश कुमार हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच आहेत.’ असा आरोप देशमुखांनी केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/