आता बीडमध्ये भगव्याचे राज्य आणायचे : उद्धव ठाकरे 

बीड : पोलीसनामा आॅनलाईन – आम्ही गोपीनाथरावांसाठी एक एक मतदारसंघ सोडला. पण, आता बीडमध्ये भगव्याचे राज्य आणायचे आहे असे वक्तव्य  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. बीडमधील एका सभेमध्ये ते बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. आता बीडमध्ये भगवा फडकवायचा असल्याचे ते म्हणाले. मुंडे अन् ठाकरे कुटुंबाचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे बहिणीविरुद्ध उमेदवार देणार नसल्याचे उद्धव यांनी गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत म्हटलं होतं. मात्र, यंदा बहिणीविरुद्ध उमेदवार देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दर्शवल्याचे दिसून येत आहे. इतकेच नाही तर, ‘आता बीडमध्ये भगव्याचे राज्य आणायचे आहे’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी थेट पंकजा मुंडेंनाच आव्हान दिलं आहे.
बीडमध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवसेनेच्या गटप्रमुख, बूथप्रमुख, शाखा प्रमुख तसेच आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी ते बोलत होते.  उद्धव ठाकरे म्हणाले, “इतर कोणताही विषय असेल तर सरकार चर्चा करत बसते, दुष्काळ जाहीर करायला मुहूर्त काढायचा काय? जर दुष्काळ जाहीर करायला सरकार विलंब लावत असेल तर लोकशाही मार्गाने हे सरकार पुढे जाईल असे वाटत नाही. शिवाय 30 वर्षानंतर देशात आणि राज्यात हिंदू सरकार आले. पण, पदरात काहीच पडले नाही, आणि काही पडेल असेही वाटत नाही. या सरकारने भ्रमनिरास केला, आजपर्यंत सगळ्यांचे अनुभव घेतले, आता शिवसेनेचा अनुभव का घ्यायचा नाही.” ‘मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे, कारण मला राज्य उभारायचे आहे’, असेही ठाकरे म्हणाले.
 पुढे त्यांच्याकडून असेही सांगण्यात आले की, गोपीनाथरावांसाठी एक एक मतदार संघ त्यांनी सोडला, पण आता त्यांना बीड मध्ये सगळ्या जागांवर भगव्याचे राज्य पाहिजे. आणि यासाठी ‘शिवसैनिकांनो घरा घरात जा, दादाशी बोला, ताईशी बोला’, असे आवाहनही उद्धव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. एवढेच नाही तर ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती न झाल्यास शिवसेनेकडून पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंविरुद्ध उमेदवार देण्यात येईल’, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.
दरम्यान,  ‘2014 साली बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेने परळीतून उमेदवार दिला नव्हता. युती तुटली तरी मैत्रीचं नात शिवसेनेनं जपलय. त्यामुळे बहिणीविरुद्ध आम्ही उमेदवार देणार नाही’, असे म्हणत शिवसेनेनं ही जागा पंकजा मुंडेसाठी खुली सोडली होती. त्यानंतर, पंकजा मुंडेंनी मोठ्या मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकली होती.

जाहीरात