लातूर ‘विभाजन’ ! उदगीर लवकरच होणार नवा जिल्हा, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आयुक्तांना दिला प्रस्ताव पाठविण्याचा आदेश

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्थगिती देणारे सरकार असा भाजपकडून ठाकरे सरकारचा उल्लेख होताना दिसतो, याच ठाकरे सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या उदगीर जिल्हा निर्मितीच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या विभागीय बैठकीत सूचना दिल्यानंतर विभागीय आयुक्तांना जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्ष जिल्हा निर्मितीचं स्वप्न पाहणाऱ्या उदगीरवासियांसाठी ही आनंदाची बाब आहे.

मराठवाड्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 9 आणि 10 जानेवारीला औंरगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी या चार जिल्ह्यांच्या महत्वाच्या प्रश्नांचा आढावा बैठक बोलावली. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लातूर आणि नांदेड जिल्ह्याचं विभाजन करुन उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आता या संबंधित निर्देश येताच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली. उदगीर येथे प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त केंद्रेकरांनी दिल्यानं सीमावर्ती भागाला लागून असलेल्या उदगीरच्या जिल्हा निर्मितीची आशा पल्लवीत झाली आहे.

अंबाजोगाई, उदगीर जिल्ह्याची मागणी –

मराठवाडा विकासाचा मोठा अनुशेष कायम आहे. मराठवाड्यातील बीड जिल्हाचं विभाजन करुन अंबाजोगाई या जिल्हाची निर्मिती करावी तर नांदेड आणि लातूर जिल्ह्याचं विभाजन करुन उदगीर जिल्हा निर्माण करावा अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. मागील 30 वर्षात तीस वर्षात सहा मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्हाची निर्मिती करु असं आश्वासन दिलं परंतु अजूनही मागणी प्रलंबित आहे. उदगीर जिल्हा निर्मितीच्या हलचाली सुरु झाल्याने आता अंबाजोगाईची मागणी जोर धरु शकते.

विदर्भाला हवेत 11 जिल्हे –

जिल्हा प्रशासन प्रत्येक गावापर्यंत पोहचावी यासाठी लहान जिल्ह्यांचा पर्याय चांगला आहे. त्याच अनुषंगाने विदर्भातील मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करण्याची मागणी अनेक दशकांपासून आहे. चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, अमरावती हे जिल्हे भौगोलिकदृष्ट्या मोठे आहे. त्यामुळे विकासाला अनेक मर्यादा येतात. याच कारणाने विदर्भाचे ब्रह्मपुरी, चिमुर, अहेरी, काटोल, आष्टी, पुसद, अचलपूर, खामगाव असे नवे 11 जिल्हे निर्माण करावेत अशी मागणी कायम केली जात आहे.

जिल्हा निर्मितीचा इतिहास –

– 16 ऑगस्ट 1982 साली उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करुन लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

– लातूरमध्ये लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरुर, अनंतपाळ, अहमदपूर आणि उदगीर असे 10 तालुके आहेत.

– लातूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7 हजार 157 किलोमीटर आहे.

– 1 ऑगस्ट 2014 साली सरकारकडून पालघरची निर्मिती केली गेली.

– पालघरनंतर नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास 37 वा जिल्हा आहे.

फेसबुक पेज लाईक करा