UGC च्या निर्णयाविरुद्ध युवासेनेची HRD कडे धाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यूजीसीने सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारला हा धक्का समजला जात आहे. त्यामुळे युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी एचआरडीकडे धाव घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यात वाढत चाललेली कोरोनाची परिस्थिती पाहता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता.

वरूण सरदेसाई यांनी आपली संतप्त भूमिका मांडताना म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे लॉजिक काय आहे. सप्टेंबरपर्यंत कोरोनावर लस येणार आहे की कोरोना संपणार आहे ? परीक्षा घ्यायच्याच होत्या तर मग कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असताना घ्यायच्या होत्या. आता जर सप्टेंबरमध्ये परीक्षा घेतली तर त्यानंतर पेपर तपासणी, फेरतपासणी, निकाल लावणे यासाठी विद्यापीठाला मोठे मनुष्यबळ वापरावे लागणार आहे. त्यामुळे ही सगळी प्रकिया होईपर्यंत जानेवारी उजडू शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती सरदेसाई यांनी बोलून दाखवली आहे.

यूजीसीच्या गाईडलाईन्स नुसारच राज्याने परीक्षा रद्द केल्या आहेत. पण आता युजीसीने परवानगी दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून एचआरडी मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांना पत्र लिहिले आहे, अशी माहिती युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी दिली.

परीक्षा होणारच, यूजीसीने दिली मान्यता
युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने एक नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार सप्टेंबर महिन्यापूर्वी परीक्षा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तर कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ऑफलाइन किंवा ऑनलाइन पदव्युत्तर परीक्षा होणार आहेत. युजीसीने नियमावली जाहीर केल्यामुळे देशभरातील विद्यापीठांना परीक्षा घेणे आता बंधनकारक ठरणार आहे.