वाद मिटवण्यासाठी पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रासोबतच ‘या’ देशाकडे धाव 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४२ जवान शहिद झाले. त्यावेळी या दहशतवादी हल्ल्याला भारताने एअर स्ट्राइक करून उत्तर दिले. दरम्यान, भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानने थेट संयुक्त राष्ट्रांच्या महासचिव तसेच रशियाकडे धाव घेतली असून दोन्ही देशातील वाद मिटवा अशी विनवणी केली आहे.

गुरुवारी ( १४ फेब्रुवारी ) दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी आदळली. यादरम्यान ४४ जवान शाहिद झाले. विशेष म्हणजे, लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. यामुळे, भारत – पाकिस्तानचा वाद सध्या शिगेला पोहंचला आहे. दरम्यान या दहशतवादी हल्ल्याला भारताने एअर स्ट्राइक करून उत्तर दिले. भारतीय वायुसेनेच्या मिराज २०००’च्या १२ लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास ३५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. विशेष म्हणजे, भारताकडून रणनीतिक आणि कुटनीतिक स्तरावर वाढवण्यात येणाऱ्या दबावामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मोदींनी त्याला प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि रशियाने दक्षिण
आशियामधील तणाव निवळण्यासाठी मध्यस्थी करावी , अशी विनवणी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर, यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची भाषा करत भारतासमोर चर्चेसाठी हात पुढे केला होता.

विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेले तणावाचे वातावरण लवकरच संपुष्टात आले पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला आशा आहे की, दोन्ही देशांमधील तणाव लवकरच निवळेल, अनेक वर्षांपासूनचा असलेला हा वाद लवकर मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटले होते.