आठवीपर्यंत प्रत्येक शाळेत मराठी शिकवणे बंधनकारक : देवेंद्र फडणवीस

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या मराठी भाषा अभ्यासक्रमातून गायब होते की काय असं वाटत आहे. त्यामुळे मराठी भाषा शिकवणे राज्यातील प्रत्येक शाळेत आठवीपर्यंत बंधनकारक करण्यात आले आहे, गुरुवारी ६ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. मराठी भाषा ही समृध्द भाषा आहे. त्यामुळे आठवीनंतरही प्रत्येक शाळेने मराठी भाषेला महत्त्व दिले पाहिजे, असा आग्रही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. ठाण्यातील श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया शाळेच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यावेळी कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले.

प्राचीन साहित्यातही मराठी आणि तामिळ या दोन भाषा समृद्ध असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे मराठीमधील विज्ञान, कला, साहित्याच्या समृद्ध खजिन्यापासून दूर राहू नका, असे कळकळीचे आवाहन फडणवीसांनी केले.

मराठी भाषा कशी मागे पडत चालली आहे. मराठी भाषा ही आपली संस्कृती आहे. परंतु आज महाराष्ट्रातच मराठीचा ऱ्हास होऊ लागला आहे, असी चिंता विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रभाषा हिंदी असली आणि इंग्रजी शिकणे अनिवार्य असले, तरी आपली राज्यभाषा मराठी शिकणे अत्यावश्यक आहे. इतर राज्यांत मुख्यत्वे पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये सीबीएसई अथवा कोणत्याही शाळेत त्या राज्याची राज्यभाषा शिकणे व शिकवली जाणे अनिवार्य आहे. तसे ते आपल्या महाराष्ट्रात होताना दिसत नाही. महाराष्ट्रात प्रत्येक शाळेत मराठी भाषेला मानाचे स्थान देण्याची मागणी, यावेळी दर्डा यांनी केली.

त्यावर फडणवीसांनी, ‘आपण राज्यात आठवीपर्यंत प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकणे व शिकवणे बंधनकारक केले आहे. परंतु, काही शाळा त्यामधून पळवाटा शोधतात. मराठी भाषेतील खजिन्यापासून दूर जायचे नसेल, तर प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना मराठी शिकवलीच पाहिजे’, असं यावेळी सांगितलं.

गेल्या पाच वर्षांत शिक्षणाचा स्तर उंचावला असून महाराष्ट्र यात तिसऱ्या क्रमाकांवर आहे. भविष्यात महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत क्रमांक एकवर असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांचा शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या मुलांना डिजिटल तंत्रज्ञानानुसार शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे या शाळांचा स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. भविष्यात झेडपीच्या शाळा या इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांप्रमाणे सक्षम करण्याचे काम सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.