धक्कादायक ! ‘भारतात एवढा’ काळा पैसा, तुमचेही डोळे फिरतील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काळ्या पैशावरून नेहमीच सर्वत्र चर्चा झडत असतात. राजकीय पक्षांकडूनही या मुद्द्याचे नेहमीच राजकारण केले जाते. मात्र आता एनआयपीएफपी, एनसीएईआर आणि एनआयएफएम या तीन बड्या संस्थांनी संशोधन करून प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार १९८० सालापासून २०१० पर्यंतच्या कालावधीत भारतीयांकडून परदेशात पाठवण्यात आलेल्या पैशांचा आकडा समोर आला आहे. या ३० वर्षांच्या कालावधीत २४६.४८ अब्ज डॉलर (१७,२५,३०० कोटी रुपये) ते ४९० अब्ज डॉलर (३४,३०,००० कोटी रुपये) एवढा प्रचंड पैसा भारतीयांकडून परदेशात पाठवण्यात आला आहे.

काय म्हणतोय या संस्थांचा अहवाल :
मार्च २०११ मध्ये काळ्या पैशावरून राजकारण तापल्यामुळे सरकारने एनआयपीएफपी, एनसीएईआर आणि एनआयएफएम या तीन संस्थांना देश आणि देशाबाहेरील भारतीयांच्या काळ्या पैशाचा शोध घेण्याचे काम सोपवले होते. त्यांचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला.

१. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फाइनॅन्शल मॅनेजमेंट (एनआयएफएम) या संस्थेच्या अहवालानुसार, १९९० ते २००८ या कालावधीत १५,१५,३०० कोटी रुपये भारतीयांनी परदेशात पाठवले.

२. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी अँड फाइनान्स (एनआयपीएफपी) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १९९७-२००९ या कालावधीत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ०.२ ते ७.४ टक्के काळा पैसा भारतीयांकडून परदेशात पाठवण्यात आला.

३. ३.नॅशनल काऊंसिल ऑफ अप्लाइड इकनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) यांनि केलेल्या सर्व्हेक्षणानुसार १९८० ते २०१० या तीस वर्षांमध्ये भारतीयांनी परदेशात सुमारे २६,८८,००० लाख कोटींपासून ते ३४,३०,००० कोटी रुपये पाठवले आहेत.

सर्वाधिक काळा पैसा या क्षेत्रांमध्ये :
आर्थिक व्यवहारांच्या स्थायी समितीने सोमवारी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार काही ठराविक क्षेत्रांमधून काळा पैसा जास्त प्रमाणात निर्माण होत असल्याचे समोर आलेले आहे. या तीन संस्थानी केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार गुटखा, तंबाखू, व्यापारी माल, सोने-चांदी, चित्रपट, शिक्षण, बांधकाम, खाणकाम, औषधे, पान मसाला अशा क्षेत्रात सर्वाधिक काळा पैसा निर्माण होत आहे.

काळ्या पैशाबाबत अंदाज बांधण्याची ठोस अशी कार्यपद्धती नाही :
‘देशातील आणि देशाबाहेरील काळ्या पैशाची सद्यस्थिती आणि त्याचे विश्लेषण’ या नावाच्या अहवालात म्हटल्यानुसार एखाद्या तर्कावरून काळ्या पैशाबाबतची ठोस कार्यपद्धती सांगितली जाऊ शकत नाही किंवा पैशाच्या साठवणुकीवर किंवा त्याच्या एकत्रिकरणाचा अंदाजही बांधला जाऊ शकत नाही. तसेच याच्या तपास पद्धती आणि दृष्टिकोन याविषयी सर्व तज्ञांमध्ये एकमतही नाही. त्यामुळे या अहवालांमध्ये मांडण्यात आलेल्या गोष्टी मूलभूत ठोकताळे आणि त्यातील छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून आहेत आणि कोणत्याही एका प्रकारच्या तपास पद्धतीने यातील अंदाज समोर आलेले नाहीत.

आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग