इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांबाबत अनिश्चितता

पोलीसनामा ऑनलाईनः कोरोनाचा ( corona) यंदाच्या शैक्षणिक वर्षांला (academic year) मोठा फटका बसला आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेबाबतही अनिश्चितता (uncertainty-about-10th-12th-exams) आहे. शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतात, यावर याबाबतचा निर्णय अवलंबून आहे. कोरोनामुळे दहावीचा परीक्षेतील भुगोलाचा पेपर रद्द केला होता. या पार्श्वभूमीवर परीक्षेचे काय होणार याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

कोरोनामुळे यंदा राज्यातील शाळा आणि महाविद्यालये अद्याप सुरु नाहीत. ऑनलाइन पद्धतीने आणि शक्य तिथे शिक्षक गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवतात. 10 आणि 12 अनुत्तीर्ण आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे 10 आणि 12 परीक्षेचा निकाल जुलैमध्ये जाहीर झाल्याने फेरपरीक्षा पुढे ढकलली गेली.आता ही परीक्षा 20 नोव्हेंबरपासून होणार आहे. या बदललेल्या वेळापत्रकाचा परिणाम दहावी आणि बारावीच्या मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षांवरही होऊन परीक्षा उशिरा होण्याची शक्यता आहे.

राज्य मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू होते. मात्र, यंदा परीक्षेबाबत अद्याप निर्णय झाला नाही. 10 आणि 12 विद्यार्थ्यांचे अर्ज त्यांच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांकडून भरून, तपासून घेतले जातात. यंदा करोनामुळे शाळा-महाविद्यालये सुरू नाहीत. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरल्याशिवाय परीक्षेचे वेळापत्रक करता येणार नाही, अशी माहिती राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. सद्य:स्थितीत परीक्षा कधी होतील याबाबत काहीही सांगता येणार नाही. कारण त्याबाबत अद्याप निर्णयही झाला नसल्याने त्याचे नियोजन केले नाही. मात्र 10 आणि 12 परीक्षा शाळा सुरू होण्यावर अवलंबून आहेत, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

ऑनलाइन अर्ज भरणे अशक्य
दहावी आणि बारावीच्या परीक्षांची अर्ज प्रक्रिया संवेदनशील आहे. विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज शाळा स्तरावर तपासून विभागीय मंडळ आणि राज्य मंडळाकडे पाठवले जातात. त्यामुळे परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवणे शक्य नाही, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.