Nagpur News : ‘कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग वाढता कामा नये’ : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणं, गर्दीवर नियंत्रण ठेवणं, लसीकरण पूर्ण क्षमतेनं करणं आणि सोबतच कोणत्याही परिस्थितीत बाधितांची संख्या वाढणार नाही याची काळजी घेणं या सर्व आघाड्यांवर एकाच वेळी प्रशासनाला काम करायचं असून यासाठी सर्व यंत्रणांनी सामंजस्यानं आणि सहकार्यानं पूर्ण गतीनं कार्यरत व्हावं असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिले.

ज्या खासगी रुग्णलयात सिटीस्कॅन केलं जात आहे तेथे रुग्णांमध्ये कोविडची लक्षणं आढळ्यास त्याबाबत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास किंवा शासकीय वैद्यकीय रुग्णालय नियंत्रण कंक्ष येथे त्या रुग्णाची माहिती त्वरीत द्यावी. तसंच संबंधित रुग्णाला कोरोना चाचणी करण्यास सूचना द्याव्यात. यात दिरंगाई करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही ठाकरे यांनी दिल्या आहेत.

गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यचात कोरोना बाधितांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत ही वाढ ढळकपणे पुढे यत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी काही निर्बंध लावणं अनिवार्य होणार आहे. यासंदर्भात आज आरोग्य, महसूल, पोलीस व अन्य सर्व यंत्रणांच्या विभाग प्रमुखासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बचत भवन येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, महसूल तसंच पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.