‘महाविकास’ सरकार बैलासारखं, टोचल्याशिवाय पुढे जात नाही : नितीन गडकरी

पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असून महाविकासआघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं, त्याशिवाय ते पुढे जात नाही, असा टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे. येथे आयोजित नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, निवडणुकीत जातीपातीचे राजकारण व्हायला नको. माणूस जातीने मोठा होत नसतो तर कर्तृत्वाने मोठा होतो. निवडणुका आमच्या जातीचा आहे म्हणून उमेदवारी मागितली जाते. विविध पक्षांमध्ये जातीनिहाय आघाड्या आहेत. त्या बंद झाल्या पाहिजे. कार्यकर्त्यात जात नसते मात्र ज्यांना उमेदवारी पाहिजे असते त्यांना जात आठवते. परंतु, राज्यातील आघाडी सरकार व केंद्रातील विरोधक जातीचा राजकारण करत आहेत त्यांना धडा शिकवायला हवा. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात आली. दरम्यान , सरकार बदललं आणि काम ठप्प झालं. नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी या सरकारला एक वर्ष लागलं. भाजपचं सरकार असतं तर एक महिन्यात झालं असतं.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी यावेळी बोलताना खरमरीत टीका महाविकासआघाडी सरकारवर केली. विश्वासघात करत राज्यातील पक्षांचे सरकार आलं. पण, आज सरकारमधील एकही मंत्री वर्षभरातला आपलं काम सांगू शकलेला नाही. शेतकऱ्यांना दिलेले वचन लक्षात नाही; मात्र मुख्यमंत्रीपदाचा वचन त्यांच्याबरोबर लक्षात आहे. हे सरकार आहे की तमाशा ? ओबीसी मुलांना जगात चांगले ठिकाणी शिकता यावे यासाठी योजना आणली. मात्र, हे सरकार काय करते माहित नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं. परंतु, या सरकारमधील मंत्री वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. त्यांच्यातच वाद निर्माण होत आहेत.