महाराष्ट्रातही लवकरच राजकीय ‘भूकंप’ ! ‘महाविकास’चा मोठा नेता आमच्या संपर्कात, ‘या’ केंद्रीय मंत्र्यांचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक महिन्यांपासून पक्षावर नाराज असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी अखेर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे मध्य प्रदेशातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला. दरम्यान, आता मध्य प्रदेशमधील पडसाद महाराष्ट्रात देखील उमटणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत आल्यास राज्यात मजबूत सरकार अस्तित्वात येईल. तसेच असं काही न घडल्यास लवकरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षात बंडखोरी होईल असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचा एक मोठा नेता आमच्या संपर्कात असल्याचा मोठा खुलासा देखील रामदास आठवले यांनी यावेळी केला. रामदास आठवले पुढे म्हणाले कि, ‘ज्योतिरादित्य शिंदे हे मुळचे महाराष्ट्राचे असून मराठी भाषिक आहे. त्यांची आजी देखील याआधी भाजपा पक्षात होत्या. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश करुन घरवापसी केली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपावर टीका करण्यात येत आहे. मात्र भाजपाने कोणत्याच प्रकारची फोडाफोडी केली नसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तातडीनं बैठक बोलावली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक 22 आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. त्यांनतर आता सकाळी मोदी आणि शहांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपा प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. ’18 वर्षांचा प्रवास मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता एक नवीन सुरुवात करायची आहे,’ असंही ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले आहेत.