संतापजनक ! उन्नावमध्ये होळी दिवशीच इयत्ता 3 री च्या मुलीवर ‘लैंगिक’ अत्याचार, केली हत्या

उन्नाव : वृत्तसंस्था – एकीकडे देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जात असताना उत्तर प्रदेशातील उन्नाव मध्ये होळीच्या दिवशी हादरवून सोडणारी घटना घडली आहे. मंगळवारी ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे मात्र उन्नाव मध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही मुलगी इयत्ता तिसरी मध्ये शिकत होती. या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, होळीच्या दिवशी आरोपीने या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि तिला शेतात फेकून हा आरोपी फरार झाला. जेव्हा या घटनेबाबत मुलीच्या कुटुंबियांना माहिती मिळली तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तातडीने कुटुंबीयांनी मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथून मुलीला हॅलेट रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, मोठे प्रयत्न करून देखील डॉक्टर मुलीचा प्राण वाचवू शकले नाहीत.

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक विक्रांत वीर भारी यांनी पोलिसांचे पथक, श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमसह रुग्णालय आणि घटनास्थळाला भेट दिली. याच पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात काही दिवसांपूर्वीच आणखी एका मुलीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याची धक्कादायक प्रकार घडला होता.मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

प्रियांका गांधी यांची युपी सरकारवर टीका
या घटनेनंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विट केले. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना मुलींवर अत्याचार होण्याच्या सर्वाधिक घटना घडत आहेत, अशी टीका करत सरकारवर अशा घटनांचा काहीच परिणाम होत नाही का, असा सवालही प्रियांका गांधी यांनी केला आहे. एका नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शेवटी हे केव्हापर्यंत चालणार?, असा उद्विग्न सवालही त्यांनी विचारला आहे.