मराठवाड्यासह विदर्भात गारपीटीमुळे फळबागांचे मोठे ‘नुकसान’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला असताना आता अवकाळी पावसानेही शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भात काही भागात अवकाळी पावसाचा तडाखादिला आहे. मोसंबी, आंबा, डाळिंब, द्राक्ष बागांचे नुकसान झाले असून, गहू, हरभरा, मका अशा रब्बी पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. वाशिम, यवतमाळ, परभणी, जालना, जळगाव, अमरावती, वर्धा, धुळे, हिंगोली, औरंगाबाद या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

मागील आठवड्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले होते. त्या संकटातून बाहेर पडत असताना पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. यात बर्‍याच ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍यासह गारपीट झाल्याने फळबागांना फटका बसला आहे. मंगळवारी रात्री अमरावती जिल्ह्यात अनेक तालुक्यात गारपीटसह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. तर, आज सकाळी पुन्हा तिवसा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार तालुक्यामधे वादळी वार्‍यासह गारपीटमुळे केळी, गहू, संत्रा, हरभरा पिकांचे मोठं नुकसान झाले आहे.

तर, वाशिम जिल्ह्यात पुन्हा एकवेळा पावसाने हजेरी लावली. तडाखा; ज्वारी, हरभरा, गव्हाचं मोठं नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्याच्या वर्धा, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, समुद्रपूर, देवळी, सेलू तालुक्याला अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा बसला. तर, काही भागात बारीक गारा पडल्या आहे. तासभर सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाोने हजेरी लावली. यावेळी विजांचाही जोरदार कडकडाट होत होता. परिणामी काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला.

तर, काढणीला आलेल्या गहू, हरभरा आदी पिकांचं नुकसान झालं. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात गारांचा पाऊस झाला. तर, उज्जैनपुरी, हिवरा राळा, अन्वी परिसरात पावसाबरोबर गारा बरसल्या. यामुळे गहू, डाळिंब, मोसंबी, मका, आंबा आदी पिकांचे नुकसान झालं. यवतमाळ, जळगाव, धुळे जिल्हयातही पावसाने शेतकर्‍याचे मोठे नुकसान केले आहे.