घरी यायला १० मिनिटे उशीर…पतीचा फोन…’तलाक, तलाक, तलाक’

लखनौ : वृत्तसंस्था – तिहेरी तलाक नुकताच लोकसभेत मंजूर झाला आहे. उत्तरप्रदेशातील इताह येथे एक तिहेरी तलाक ची घटना घडली आहे. यापूर्वी देखील बारीक सारीक कारणावरून तोंडी तलाक दिल्याच्या घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशातील घटनेत घरी येण्यास १० मिनिटे उशीर झाल्यामुळे महिलेच्या पतिने फोनवरून तलाक दिल्याची घटना घडलीय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ही महिला आजारी असलेल्या आपल्या आजिला पाहण्याकरिता गेली होती. त्यावेळी तिच्या पतीकडून तिला अर्ध्या तासात परत ये असे सांगण्यात आले होते. पण महिलेला यायला १० मिनिटे उशीर झाला. त्यामुळे पतीने महिलेच्या भावाच्या मोबाईलवर कॉल केला आणि महिलेला तीनवेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ म्हटले. अशी माहिती या महिलेने दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे मला पतीच्या या कृतीने धक्का बसला, असे महिलेने सांगितले.

लग्नाच्यावेळी हुंडा न दिल्याने माझ्या सासरच्या लोकांनी मला मारहाण केली होती, असे महिलेने सांगितले. माझे कुटुंब गरीब असल्यामुळे आम्ही हुंडा देऊ शकलो नाही. मला सरकारने मदत करावी अन्यथा मी आत्महत्या करेल, असेही महिलेने म्हटले आहे.दरम्यान, २७ डिसेंबर रोजी लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले होते. या विधेयकानुसार तिहेरी तलाक हा गुन्हा ठरणार आहे.