आगामी विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ मुळे मनसेचे ‘गणित’ चुकणार !

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीने राज्यात चांगली मते घेतली असली तरी एकाही विधानसभा मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांना आघाडी मिळालेली नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर हे दोन्ही मतदारसंघांत पराभूत झाले, तर त्यांच्या उमेदवारांना एकही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेता आलेली नाही. अकोल्यातील बाळापूरमध्ये या पक्षाचा आमदार असला तरी तेथेही वंचित बहुजन आघाडी पिछाडीवर आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर कितीपत चालतो यापेक्षा मनसेला सक्षम पर्याय ठरतो ,याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत निर्विवाद यश मिळविणा-या भाजप आणि शिवसेना युतीने विधानसभानिहाय मतदारसंघांचा आढावा घेतल्यास २२८ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळविली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त ५५ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४१ मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीचे चार तर काँग्रेसचा जेमतेम एका मतदारसंघात उमेदवार निवडून आला. एमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एका मतदारसंघांमध्ये विजयी झाले आहेत.

आघाडीची अवस्था बिकट ठरणार ?
लोकसभेतील विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून युतीने २२८ मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत युतीने ४२ जागा जिंकल्या होत्या आणि २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली होती. पण पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. तेव्हा भाजप १२२, शिवसेना ६३, काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. स्वतंत्रपणे लढूनही भाजप आणि शिवसेनेचे १८५ आमदार निवडून आले होते. युती असती तर २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आले असते, असे युतीच्या नेत्यांनी नंतर मान्य केले होते.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकात आघाडीची अवस्था बिकट ठरणार तर आहे शिवाय ‘वंचित’मुळे मनसेचे ‘गणित ‘ चुकणार आहे आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या पक्षांना मोठा फटका बसणार आहे.