‘बदली’मुळं नाराज असलेल्या मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरमानींचा ‘राजीनामा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरमानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ताहिलरमानी यांनी सर्वोच्च न्यायलयाच्या कॉलेजियमच्या निर्णयावर नाराजी दर्शवली ज्यामुळे त्यांची मद्रास उच्च न्यायालयातून मेघालय उच्च न्यायालयात बदली करण्यात आली. या निर्णयाला विरोध दर्शवत न्यायाधीश ताहिलरमानी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवला आहे.

ताहिलरमानी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपला राजीनामा सोपावला आणि भारताचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना देखील आपल्या राजीनाम्याची एक प्रत पाठवली आहे.

मेघालयच्या उच्च न्यायालयात केली होती शिफारस
न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील कॉलेजियमने ताहिलरमानी यांना मेघालयच्या उच्च न्यायालयात स्थानांतरित करावे अशी शिफारस केली होती. त्यांना मागील वर्षी मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे पद बहाल करण्यात आले होते.

8 ऑगस्टला पुनर्विचाराची शिफारस केली होती
कॉलेजियमने 28 ऑगस्टला त्यांना स्थानांतरित करण्यात यावे अशी शिफारस केली होती, ज्यावर त्यांनी पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. त्यांनी कॉलेजियमच्या निर्णयाचा विरोध केला होता. न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षता असलेल्या कॉलेजियम ज्यात जस्टिस बोबडे, एनवी रमना, अरुण मिश्रा आणि आरएफ नरीमन यांचा समावेश होता.

मेघालयच्या उच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिस ऐके मित्तल यांना मद्रास उच्च न्यायालयात ट्रांसफर करण्यात आले होते. याबरोबरच न्यायाधीश विजया के. ताहिलरमानी यांच्या बदली मेघालय उच्च न्यायालयात करण्यात आली. त्यानंतर ताहिलरमानी यांनी त्याला विरोध दर्शवत आपल्या पदाचा राजीनामा दिला.