US : कमला हॅरिस यांची उप-राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी भारताला झटका ?, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या राजकारणात मुख्य पदांवर पोहचण्यात भारतीय-अमेरिकन समजाला मोठा कालावधी लागतो, परंतु कमला हॅरिस यांनी खुप कमी वेळात इतिहास रचला आहे. डेमोक्रेट्स पार्टीकडून मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उप-राष्ट्रपती पदाच्या उमेदवार बनवण्यात आले आहे. त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला होण्यास मूळ भारतीय वंशाच्या सुद्धा पहिल्या महिला आहेत, ज्यांनी मोठा पल्ला गाठला आहे. उमेदवारीच्या घोषणेनंतर कमला हॅरिस यांनी डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बायडन यांच्यासोबत एका रॅलीला सुद्धा संबोधित केले.

उमेदवारी हा सन्मान
कमला हॅरिस यांनी याप्रसंगी म्हटले की, जो बायडन यांच्याकडून नामांकित करण्यात आल्याने सन्मानीत झाल्यासारखे वाटत आहे. जो बायडन अमेरिकन लोकांना एकतेच्या सूत्रात बांधू शकतात, कारण त्यांनी जीवनभर आपल्यासाठी लढाई लढली आहे. राष्ट्रपती बनल्यानंतर ते अमेरिकेला आपल्या आदर्शनुसार चालवतील.

भारतीय संस्कृतीचा अभिमान
कमला हॅरिस यांच्या उमेदवारीने भारतात आनंदाचे वातावरण आहे. कमला हॅरिस यांची आई श्यामला गोपालन चेन्नईमध्ये जन्मल्या होत्या आणि वयाच्या 19 व्या वर्षी त्या बर्कले युनिव्हर्सिटीत संशोधन करण्यासाठी अमेरिकेत गेल्या होत्या. श्यामला गोपालन यांनी अर्थशास्त्राचे विद्यार्थी डॉनल हॅरिस यांच्याशी 1963 मध्ये विवाह केला. दोघांची भेट एका आंदोलनाच्या दरम्यान झाली होती. मात्र, 1970 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. गोपालन यांनी आपल्या दोन्ही मुलींना भारतीय संस्कृतीचा अभिमान शिकवला.

आजोबा होते स्वातंत्र्य सैनिक
कमला हॅरिस यांनी सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले की, माझ्या आईला भारतीय असण्याचा खुप गर्व होता. तिने आम्हाला सुद्धा हेच शिकवले. आम्ही नेहमी भारतात जात असू. आईशिवाय माझ्या जीवनावर आजोबा पी. व्ही. गोपालन यांचाही प्रभाव आहे. माझे आजोबा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक होते. जेव्हा मी मद्रासमध्ये आजोबांसोबत मॉर्निंग वॉकसाठी जात असे, तेव्हा ते आपल्या मित्रांसोबत राजकारण, भ्रष्टाचार आणि न्याय याबाबत चर्चा करत असत. माझ्या व्यक्तीमत्वावर याचा खोलवर परिणाम झालेला आहे.

सीएएवरील भूमिकेकडे लक्ष
भारतीय वंशाच्या असल्याने कमला हॅरिस यांच्याकडून भारतीयांना खुप अपेक्षा आहेत. लोकांना वाटते की, जर कमला हॅरिस अमेरिकेच्या उप राष्ट्राध्यक्ष झाल्या तर भारत-अमेरिकेचे संबंध मजबूत होतील. मात्र, काश्मीर आणि नागरिकत्व कायद्यावर त्यांची कोणती भूमिका असणार, हे पाहणे मोदी सरकारसाठी महत्वाचे ठरणार आहे. कमला हॅरिस कायदा सुव्यवस्था आणि मानवाधिकारांबाबत अतिशय रोखठोक भूमिका घेणार्‍या म्हणून ओळखल्या जातात. काश्मीरमधील कलम -370 च्या मुद्द्यावर आणि मानवाधिकारबाबत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

स्पष्टपणे मत मांडण्यास मागेपुढे पाहणार नाही
इंडिया टुडेशी बोलताना कमला हॅरिस यांचे मामा डॉ. गोपालन बालचंद्रन यांनी म्हटले, तिच्यामध्ये जनसेवा आणि मानवाधिकारांबाबत प्रचंड संवेदनशीलता आहे. ती भले भारतीय वंशाची असली तरी, उप राष्ट्राध्यक्ष किंवा एक खासदार म्हणून तिला वाटते की, भारतात काही असे घडत आहे ज्यामुळे मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे तर ती स्पष्टपणे आपले मत मांडण्यास मागेपुढे पाहणार नाही. कलम 370 वर विचारल्यावर बालचंद्रन यांनी म्हटले, कमला कलम 370 वर जो स्टँड घेईल, तो काश्मीरमध्ये नागरिकांचे स्वातंत्र्य बाधित होणे किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी नष्ट करण्याशी संबंधीत जोडलेला असेल.

परराष्ट्र मंत्र्यांवर केली होती टीका
मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कमला हॅरिस यांनी भारतीय अमेरिकन खासदार आणि आपल्या सहकारी प्रमिला जयपाल यांची भेट न करण्यावरून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर कठोर टीका केली होती. कमला हॅरिस यांनी ट्विट केले होते की, कोणत्याही परराराष्ट्राच्या सरकारला हे सांगणे अजिबात अयोग्य आहे की, काँग्रेसच्या बैठकीत कोणत्या सदस्यांना बोलावण्याची परवानगी दिली जावी आणि कुणाला नाही. उघड आहे की, जर कमला हॅरिस उप-राष्ट्राध्यक्ष बनल्या तर मोदी सरकारची नजर या गोष्टींकडे राहील.

काही म्हणतात डेमोक्रेटिक पार्टी भारतविरोधी
डेमोक्रेटिक पार्टीचे विरोधक असलेले भारतीय-अमेरिकन हे जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या डेमोक्रेटिक पार्टीला भारतविरोधी असल्याचे मानतात. टिकाकारांचे म्हणणे आहे की, डेमोक्रेटिक पार्टी, डावे आणि पुरोगामींचा गड आहे जे काही मुस्लिम गटांच्या इशार्‍यावर मोदी सरकारवर टीका करतात. डेमोक्रेटिक पार्टीकडून राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडन यांनी निवडणुकीच्या अगोदर मुस्लिम अमेरिकन समुदायासाठी एक अजेंडा प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये त्यांनी काश्मीरमध्ये उचलण्यात आलेल्या पावलांवर आणि सीएएच्या मुद्यावर मोदी सरकारवर टीका केली आहे.

ट्रम्प यांचा पक्ष मोदी सरकारसाठी अनुकूल
याउलट, रिपब्लिकन पार्टीचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरच्या घटनाक्रमावर हळू आवाजात प्रश्न उपस्थित करण्याशिवाय भारताचे अंतर्गत प्रकरण असल्याचे म्हणत टिप्पणी करण्याचे टाळले. मागील प्रशासनाने मोदी सरकारला शस्त्रात्र पुरवठा केला होता आणि चनीसोबतच्या सध्याच्या सीमा वादात मोदी सरकारला खुले समर्थन दिले. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प एकमेकांसोबत रॅलित सुद्धा दिसले आहेत. ह्यूस्टनमध्ये हाउडी मोदी कार्यक्रमात पीएम मोदी यांनी भारतीय-अमेरिकन समाजाला ट्रम्प यांना मत देण्याचे आवाहन केले होते.

मानवाधिकारावर रोखठोक भूमिका
ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये संशोधक आणि सेवानिवृत्त मुत्सद्दी नवदीप सूरी यांचे म्हणणे आहे की, भारतीयांनी कमला हॅरिस यांच्या नामांकनामुळे जास्त आनंदी होऊ नये. अमेरिकेसोबत जवळच्या नात्याची शक्यता पाहता खुश होत असाल, तर आपल्याला हे सुद्धा पाहिले पाहिजे की, कमला हॅरिस मानवाधिकाराच्या मुद्द्यावर अतिशय रोखठोक आहेत किंवा एखाद्या अन्य मुद्द्यावर त्यांचे मत भारतातील मोदी सरकारला त्रासदायक ठरू शकते.

वीजासाठी भारतीयांना मिळू शकतो दिलासा
वॉशिंग्टनच्या वरिष्ठ पत्रकाराने म्हटले, अमेरिकेतील सध्याचे रिपब्लिकन पार्टीचे सरकार तुलनेत डेमोक्रेटिक पार्टीचे सरकार एखादवेळी भारताच्या बाजून नसू शकते. मात्र, इमिग्रेशन आणि विजा नियमांबाबत कमला हॅरिस सध्याच्या ट्रम्प सरकारच्या तुलनेत जास्त अनुकूल असू शकतात, ज्याचा फायदा भारतीयांना होईल. मागच्या वर्षी, कमला हॅरिस यांनी ग्रीन कार्डची संख्या वाढवण्याचे विधेयक पास करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु, हे विधेयक पास होऊ शकले नाही.

भारतीय तरूणांमध्ये लोकप्रीय
भारतीय-अमेरिकन तरूणांमध्ये कमला हॅरिस लोकप्रीय आहेत. जो बायडन यांच्यानुसार, कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा होताच 24 तासांच्या आत कॅम्पेनमध्ये 26 मिलियन डॉलर (समारे दोन अरब) चा फंड जमा झाला आहे. भारतीय-अमेरिकनांना निवडणूक जिंकण्यात मदत करणारा एक अ‍ॅडव्होकेटसचा ग्रुप इम्पॅक्टने घोषणा केली आहे की, ते कमला हॅरिस सारख्या समान मूल्यांना मानणार्‍या उमेदवारासाठी सुमारे 1 कोटी डॉलरचा फंड जमवणार आहेत. इम्पॅक्टचे एग्झीक्यूटिव्ह डायरेक्टर नील माखिजा यांनी ट्विट केले की, हॅरिस यांनी भारत-अमेरिका या दोन लोकशाहीमध्ये सहकार्याला खुप महत्व दिले आहे. कोणताही मुद्द असो, त्या निष्पक्ष राहतील आणि या नात्याचे महत्व ओळखतील