US : मुस्लिमांवरून निशाणा साधल्यानंतर बायडन यांनी घेतली भारताची बाजू

वॉशिंग्टन : अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. डेमोक्रेटिक पार्टीकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार असलेले जो बायडन यांनी काही दिवसांपूर्वीच मुस्लिम पॉलिसी पेपरमध्ये म्हटले होते की, त्यांना अमेरिकन मुस्लीमांच्या वेदना समजतात आणि राष्ट्रपती बनल्यानंतर ते मुस्लीमांच्या विरूद्ध जगभरात होत असलेल्या घटनांबाबत पावले उचलतील. बायडन यांनी या पॉलिसी पेपरमध्ये काश्मीर आणि एनआरसीचा उल्लेख करत भारत सरकारवर टिका केली होती. मात्र, आता बायडन यांनी भारताची बाजू घेतली आहे आणि भारत अमेरिकेचा नैसर्गिक मित्र असल्याचे म्हटले आहे.

जो बायडन यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या काळात उप-राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांना या निवडणुकीत राष्ट्रपती पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. जो बायडन यांनी म्हटले की, जर त्यांनी नोव्हेंबरमध्ये होणार्‍या निवडणुकीत विजय मिळवला तर अमेरिकेचा नैसर्गिक मित्र असलेल्या भारताशी संबंध मजबूत केले जातील.

वर्चुअल फंड रेजर इव्हेंटदरम्यान भारत-अमेरिका संबंधावर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना बायडन म्हणाले, क्षेत्रात आपल्या आणि त्यांच्या स्वताच्या संरक्षणासाठी भारत मित्र राहणे आवश्यक आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी भारताची खुप गरज आहे का? या प्रश्नावर बायडन म्हणाले, होय, आपल्या सुरक्षेसाठी भारतासोबत रणनितीक भागीदारी जरूरी आहे आणि खुप महत्वाची ठरते. आपल्या 8 वर्षाच्या उप-राष्ट्रपती कार्यकाळाचा उल्लेख करत बायडन म्हणाले, सुमारे एक दशक अगोदर भारत-अमेरिका अणू करारात मला महत्वाची भूमिका बजावण्यास मिळाल्याचा अभिमान वाटतो. तो मोठा करार होता.

बायडन म्हणाले, ओबामा यांच्या कार्यकाळात भारतासोबत रणनीतीक भागीदारी मजबूत करणे आमच्या प्राथमिकतेमध्ये होते. जर मी राष्ट्रपती म्हणून निवडूण आलो तर माझी सुद्धा हिच प्राथमिकता असेल. बायडन यांनी उप-राष्ट्रपती पदावर असताना भारत-अमेरिकेचे सबंध मजबूत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती.

मात्र, काही दिवसांपूर्वी बायडन यांनी काश्मीर आणि नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून भारतावर टिका केली होती. त्यांनी पॉलीस पेपरमध्ये म्हटले होते की, काश्मिरींना त्यांचे अधिकार देण्यासाठी भारताने आवश्यक पावले उचलली पाहिजेत. जो बायडन यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि आसाममध्ये एनआरसी लागू करण्यावरून नाराजी व्यक्त केली होती.

जो बायडन यांच्या कॅम्पेन वेबसाइटवर प्रकाशित ’अमेरिकन मुस्लिम समुदायासाठी अजेंडा’ शीर्षकाने प्रकाशित पॉलिसी पेपरमध्ये म्हटले आहे की, नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसी सारखी पावले भारतीय लोकशाहीच्या बहुसांस्कृतिकता आणि धर्मनिरपेक्षतेच्या मोठ्या परंपरेच्या विरूद्ध आहेत.

पॉलिसी पेपरमध्ये म्हटले आहे की, बायडन मुस्लिम देश आणि मुस्लिम लोकसंख्या असणार्‍या देशांमध्ये होत असलेल्या घटनांबाबत मुस्लीम-अमेरिकनांच्या वेदना समजतात. या मजकुरात चीनच्या वीगर मुसलमानांना डिटेंशन कॅम्पमध्ये ठेवण्यासह काश्मीर आणि आसामचा सुद्धा उल्लेख आहे.

यामध्ये म्हटले आहे की, काश्मीरमध्ये भारत सरकारला काश्मिरींचे अधिकार परत देण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलायला पाहिजेत. असंतोषाला दाबणे, विरोध-प्रदर्शन करण्यास रोखणे किंवा इंटरनेट बंद करण्याने लोकशाही कमजोर होते.

बायडन यांच्या मुस्लिम पॉलिसी पेपरवर अनेक कट्टर हिंदुत्ववादी अमेरिकन-हिंदू संघटनांनी टिका केली होती. संघटनांनी अमेरिकन-हिंदूंवर सुद्धा पॉलिसी पेपर जारी करण्याची मागणी केली होती. तर, बायडन यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, बायडन भारताचे मित्र होते आणि त्यांनी आपल्या कार्यकाळात भारताशी संबंध मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.