सावरकरांच्या नावाचा वापर हे निव्वळ भाजपाचे राजकारण, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपने उचलून धरलेल्या सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपचा समाचार घेतला आहे. देश पेटला असताना आणि देशासमोर महिला अत्याचारांसह अर्थव्यवस्था डबघाईला आल्यासारखे अनेक ज्वलंत प्रश्न असताना केवळ सावरकरांचा मुद्दा उचलून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला.

आव्हाड म्हणाले की सावरकरांच्या नावाचा वापर हे भाजपचे राजकारण आहे. देशाची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही परिस्थिती सांभाळली नाही तर देश विकोपाला जाऊ शकतो. देशात सुरु असलेल्या महिला अत्याचारावर भाजप बोलत नाही. सध्या देशामध्ये पेटलेल्या वणव्याबद्दल सुद्धा बोलण्याची भाजपला फुरसत नाही.

आव्हाड म्हणाले की, सोशल मिडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी सर्वांच्या मोबाईलमध्ये आणि खासगी आयुष्यात डोकावणार आहेत. त्यामुळे सर्वांचे खासगी आयुष्य संपणार आहे. याकडे कोणाचे लक्ष जाऊ नये म्हणून सावरकरांचा मुद्दा पुढे करुन सर्वांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शनिवारी राहुल गांधींना सावरकरांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करुन वाद ओढावून घेतला होता. ज्याचे पडसाद आज विधानसभेच्या अधिवेशनात देखील उमटले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/