हाथरस प्रकरण : ‘…म्हणून मध्यरात्रीच केले पीडित मुलीवर अंत्यसंस्कार’, UP सरकारनं सुप्रीम कोर्टात सादर केलं शपथपत्र ! सांगितल्या ‘या’ गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केलं आहे. यात उत्तर प्रदेश सरकारनं विरोधकांवर जातीय दंगे पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. महत्त्वाचं म्हणजे युपी सरकारनं आपल्या शपथपत्रात कुटुंबीयांच्या परवानगीनंतर आणि हिंसेपासून बचावासाठी मध्यरात्री पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचंही म्हटलं आहे.

अयोध्या-बाबरी प्रकरणामुळं जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तसंच कोरोनामुळं गर्दी न होऊ देण्याचा उल्लेखही युपी सरकारनं शपथपत्रात केला आहे. युपी सरकारनं म्हटलं आहे की, अयोध्या-बाबरी प्रकरणात आलेल्या निकालाची संवेदनशीलता लक्षात घेत पीडितेच्या कुटुंबीयांच्या परवानगीनं रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

दंगली घडवण्याचे नियोजित प्रयत्न

यासंदर्भात पोलिसांना 14 सप्टेंबरला माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ पावलं उचलली. एवढंच नाही तर या प्रकरणाचा वापर करून जातीय आणि सांप्रदायिक दंगली घडवण्यासाठी राजकीय पक्षांचे काही वर्ग सोशल मीडिया, काही वर्गांच्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानं नियोजित प्रयत्न केला असंही युपी सरकारनं आपल्या शपथपत्रात म्हटलं आहे.

‘हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी’

हाथरसमध्ये मुलीवर झालेला कथित बलात्कार आणि हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणीही युपी सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. एवढंच नाही तर आपणही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकतो. मात्र निष्पक्ष तपास होऊ नये यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत असंही युपी सरकारनं म्हटलं आहे.

‘सकाळच्या सुमारास हिंसाचार होण्याचे इनपुट होते’

युपी सरकारनं आपल्या शपथपत्रात मध्यरात्री अंत्यसंस्कार का करावे लागले याचं कारणंही सांगितलं आहे. यानुसार, संबंधित मुलीच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करण्याची तयारी सुरू आहे असे इनपुट्स गुप्तचर संस्थांकडे होते. जर सकाळ पर्यंत वाट पाहिली असती तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. यामुळं संबंधित मुलीच्या कुटुंबीयांच्या परवानगीनंच रात्री मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले” असंही यात म्हटलं आहे.